सध्या वृत्तपत्रांमध्ये व वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित होणार्या बातम्यांमध्ये `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’ असे शब्द वापरले जात आहेत. हे शब्द वापरण्याविरुद्ध पंजाबमधील हिंदु धर्माभिमानी श्री. विशाल भारती, श्री. शक्तीप्रकाश देवशाली आणि अधिवक्ते श्री. योगेश गोयल यांनी चंदीगड येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बलवंत सिंग यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. वरील प्रकारचे शब्दप्रयोग वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या या प्रसिद्धीमाध्यमांनी वापरू नयेत, असा आदेश न्यायालयाने द्यावा. तसेच त्यासंबंधी सूचना प्रसिद्धीमाध्यमांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेतील भाग संक्षिप्ताने येथे देत आहोत.
याचिकाकर्त्यांचा परिचय
फिर्यादींपैकी श्री. विशाल भारती हे गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात वावरत आहेत. १५ जानेवारी १९८७ रोजी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्या वेळी त्यांच्या छातीत व गळयाजवळ दोन गोळया घुसल्या होत्या. केवळ नशिबानेच ते या हल्ल्यानंतरही वाचले. दुसरे फिर्यादी श्री. शक्तीप्रकाश देवशाली हेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८८ ते २००२ सालापर्यंत भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव होते. २००३ ते २००७ या काळात ते विश्व हिंदु परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख होते. तिसरे फिर्यादी श्री. योगेशकुमार गोयल हे सध्या चंदीगड येथील जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत.
याचिकाकर्त्यांनी मांडलेली भूमिका !
आमचा भारताची एकता व स्वयंपूर्णता यांवर विश्वास आहे. हिंदु समाजातील अस्पृशता, जातीयता व इतर सामाजिक समस्या मिटवल्या पाहिजेत, असे आमची म्हणणे आहे. आमची मातृभूमी सर्व क्षेत्रांत जगातील प्रमुख राष्ट्र व्हावे, अशी आमचे इच्छा आहे. आम्ही याचिकाकर्ते हिंदू आहोत व हिंदु धर्मातील संस्कृती व विधी यांवर आमची दृढ श्रद्धा आहे.
प्रसिद्धीमाध्यमांचे बेकायदेशीर व भारतीय संस्कृतीविरोधी कृत्य ! प्रसिद्धीमाध्यमांनी `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’, असे शब्द वापरणे, हे बेकायदेशीर व भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारचे शब्द वापरून म्हणजे भारतीय नागरिकांचा व हिंदु समाजाचा हेतूपुरस्सर अवमान केला जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी वापरलेले हे शब्द ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. निधर्मीवाद्यांनी आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी शोधून काढलेले हे अपमानकारक शब्द हिंदु संस्कृतीच्या आत्म्यावर घाला घालत आहेत. सध्या दहशतवादाशी संबंध असलेल्यांना `हिंदु दहशतवादी’ असे शब्द वापरणे म्हणजे थेट हिंदु धर्म व सहिष्णू हिंदूंकडे अंगुलीनिर्देश करण्यासारखे आहे. हिंदु धर्माच्या अनुयायांचे खच्चीकरण व मानहानी करण्यासाठीच असे शब्दप्रयोग केले जात आहेत.
धर्माच्या नावावर राष्ट्रामध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात पोलिसांनी काही हिंदूंना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हिंदूला `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ अशा प्रकारचे शब्द प्रसिद्धीमाध्यमांनी वापरणे, हे या देशाच्या राष्ट्रीय तत्त्वांच्या विरुद्ध आहे.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील काही मंडळी देशातील एकात्मता, बंधुत्व यांना फाटा देऊन हिंदूंबद्दल अपप्रचार करत आहेत. हिंदु राष्ट्राची बदनामी करणे व धर्माच्या नावावर राष्ट्रामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, हा राष्ट्रविरोधी घटकांचा डाव आहे. भारतातील विकास व सांस्कृतिक कार्यक्रम यांना खीळ घालणे व ब्रिटिशांप्रमाणे भारतातील एकात्मता फोडणे, यांसाठी राष्ट्रविरोधी घटकांना याद्वारे सुवर्णसंधी लाभली आहे.
भगवा रंग त्यागाचे व मोक्षाचे प्रतीक !
सध्या संत व समाजसुधारक वापरत असलेल्या व हिंदूंसाठी पवित्र मानल्या गेलेल्या भगव्या रंगाला लक्ष्य केले जात आहे. हा रंग त्यागाचे व मोक्षाचे प्रतीक आहे. समाजविघातक घटक भगव्या रंगाचा अवमान करून हिंदूंचा धर्म व धर्मश्रद्धा यांवर घाला घालत आहेत. भगव्या रंगाचा अवमान करणे, हे देशहिताच्या विरुद्ध आहे.
हिंदु समाजामध्ये दहशतवादाची संस्कृती नाही !
जर `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’, असे शब्द वापरले, तर आमचे, आमच्या कुटुंबियांचे व देशातील समस्त हिंदूंचे मोठे नुकसान होणार आहे; कारण हिंदु समाजामध्ये दहशतवादाची संस्कृती नाही. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांकडून झालेल्या अशा चुकीच्या कृतींमुळे हिंदु समाजावर वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे असे शब्दप्रयोग करण्यास न्यायालयाने वेळीच प्रतिबंध केला पाहिजे !


