लोकसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या दरम्यान भाषण करतांना श्री. राहुल गांधी यांनी आपण `इंडियन’ आहोत, असे म्हटले आणि त्यानंतर ओमर फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात `आपण आधी मुसलमान आहोत, मग भारतीय आहोत’, असे सांगितले. जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहे. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी आम्ही मुसलमानच रहाणार आहोत, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत !
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान त्यांच्या पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. पणजोबा इंग्लंडच्या आहारी केले होते, तर हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत !
राहुल गांधी आणि अणूऊर्जासंधी !
लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला अनेक पैलू आहेत. या लेखात श्री. राहुल गांधी आणि उमर फारुख अब्दुल्ला या दोघांच्या भाषणांचा विचार करणार आहोत. दोघेही तरुण आहेत आणि भविष्याविषयी तरुणांच्या मनात जे विचार असतात, ते या दोघांच्या भाषणातून व्यवस्थित व्यक्त होतात, असे मानण्याची बौद्धिक शिस्त विचारवंतांनी घालून दिली आहे. आपण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर `इंडियन’ म्हणून बोलायला उभे राहिलो आहोत, अशी सुरुवात श्री. राहुल गांधी यांनी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अलीकडील विदर्भ दौर्याची कथा सांगितली. कर्ज फेडता येणे अशक्य असलेल्या आणि म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या झोपडीस त्यांनी भेट दिली. काबाडकष्ट करून शेतकर्याची पत्नी आपला मोठा परिवार जगवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले. `मुले अभ्यास कधी करतात ?, कसा करतात ?’, हे विचारल्यावर त्या बाईने रॉकेलवर जळणारा भगभगीत दिवा म्हणजे टेंभा समोर आणून ठेवला आणि त्या प्रकाशात रात्री, सर्व पोटापाण्याची कामे उरकून झाल्यावर मुले अभ्यास करतात, असे सांगितले. ही कथा सांगून झाल्यावर श्री. गांधी यांनी पददलितांचे संसार सुखी होण्यासाठी विजेची आवश्यकता असून ती पूर्ती अणूऊर्जासंधीने होणार आहे, असे सांगितले. अशी दृष्टी अटलबिहारी वाजपेयींना होती, असेही जाता जाता त्यांनी सांगितले.
राहुल गांधीच्या `इंडियन’ भूमिकेला ओमर अब्दुल्लाचे आव्हान !
ओमर अब्दुल्लांनी आपण भारतीय असलो, तरी मुसलमान आहोत, हे आग्रहाने सांगितले. त्यानंतर लगेच त्यांनी हेही सांगून टाकले की, पूर्वी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम करून त्यांनी मोठी चूक केली असून भाजपसमवेत मैत्री करण्याची चूक ते पुन्हा करणार नाहीत. त्याचे कारण देतांना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप प्रत्येक प्रश्नाकडे जातीय दृष्टीने पहातो. अमरनाथ यात्रा सुरळीत चालू होती, त्यात यांनी हिंदु-मुस्लिम असा भेद आणला. काश्मीरची भूमी आमची आहे. त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. जीवनमरणाचा लढा चालू आहे. आमची भूमी आम्ही कोणालाही देणार नाही, हे भाजपवाले समजून घेत नाहीत. श्री. राहुल गांधींच्या भूमिकेला ओमर अब्दुल्लांनी आव्हान दिले आहे. तरी दोघेही बरोबर आहेत, असे मुकाट्याने मानून हिंदूंनी अणूऊर्जासंधीला मान्यता द्यावी, असा त्या दोघांचा आग्रह आहे; म्हणून या दोघांच्या भाषणांची चिकित्सा केली पाहिजे. भारतात दोनच जाती आहेत, असे स्वामी चिन्मयानंद म्हणत. एक म्हणजे आज जे हिंदु आहेत ते आणि दुसरे म्हणजे कालपर्यंत जे हिंदु होते ते. तत्त्वत: स्वामी चिन्मयानंदांची वर्गवारी योग्य आहे; परंतु व्यवहारत: बोलायचे झाले, तर या दोन जातींत तिसरी जात येऊन बसली आहे आणि ती सगळयांत मोठी आहे. ही जात स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेते. कांँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात म्हणजे १८८५ मध्ये मुसलमानांची मने जिंकण्यासाठी ज्यांनी `हिंदुत्वाचा’ त्याग केला आणि `हिंदीत्वाचा’ स्वीकार केला, त्या काँग्रेसजनांचे वंशज आज स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेतात!
काँग्रेस पक्ष स्थापनेच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ होता !
परंतु त्या वेळच्या आणि आजच्या काँग्रेसजनांमध्ये खूप मोठा फरक आहे. हिंदी राष्ट्रवादाची निर्मिती हा त्या वेळच्या काँग्रेसजनांच्या दृष्टीने एक प्रयोग होता. त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन सुरू केले नव्हते. तसेच हिंदु परंपरांचा अभिमान बाळगण्यात चूक होत असल्याचे त्यांना वाटत नव्हते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी `आजपासून मी हिंदु राहिलो नाही’ असे घोषित केले, तरी त्यांनी लिहिलेल्या `राईज ऑफ मराठा पॉवर’ (न.र.फाटकांनी केलेले मराठी भाषांतर : मराठी सत्तेचा उत्कर्ष) या पुस्तकावरून श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे मर्म त्यांना कळले होते आणि जरी व्यवहारात हे हिंदी राज्य होणार असले, तरी तत्त्वत: हे हिंदु राष्ट्रच, अशी त्यांची भूमिका होती. पुढे ३० वर्षांनी लो. टिळकांनी लखनौशी संधी करून त्या वेळच्या राजकारणात ब्रिटिशांकडून मिळणार्या सवलतीत मुसलमानांना थोडा अधिक वाटा दिला. तरी मुसलमानांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी श्री गणेशोत्सव आणि हिंदूंना स्वराज्याचा अर्थ नेमका कळण्यासाठी श्री शिवजयंत्युत्सव त्यांनी सुरू केला. त्यावरून ते हिंदुत्वाचे अभिमानी होते, हे सिद्ध होते. राजकारणाची सूत्रे गांधींच्या हाती गेली आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनात आरपार बदल झाला. हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदुत्वाचा म्हणजे हिंदु परंपरांचा तिरस्कार केला पाहिजे, हे पहिले सूत्र गांधींनी रुजवले. दुसरे सूत्र लांगूलचालनाचे. मुसलमानांनी `इंडियन’ होण्यासाठी त्यांच्या मनातील `हिंदु’विषयाची भीती नाहीशी झाली पाहिजे. मुसलमानांच्या मागण्या उदारपणे मान्य करण्याने ही भीती नाहीशी होईल आणि मुसलमानांना हिंदी राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल अणि एकसंध राष्ट्र नव्याने निर्माण होऊन जगासमोर आदर्श उभा केला जाईल, असे स्वप्न गांधींनी हिंदूंना दिले.
राहुल गांधी मुसलमानांना `इंडियन’ होण्याचा आग्रह का धरत नाहीत ?
तेव्हापासून हिंदी राष्ट्र उभे करण्याच्या एकमेव ध्यासाने हिंदू पछाडलेले दिसतात. मुसलमानांना बरे वाटावे; म्हणून काँग्रेसजन हिंदु परंपरांपासून जेवढे दूर जाता येईल, तेवढे दूर जात आहेत आणि मुसलमान मागतील, ते त्यांना देत आहेत. काँग्रेसने हिंदूंना स्वतंत्र करण्याआधी मुसलमानांना स्वतंत्र केले आणि त्यांना सिंहासनात चिणून बसवण्यासाठी पाकिस्तान नवे राष्ट्र निर्माण करून दिले. म्हणजे हिंदी राष्ट्र बनवण्याच्या ढोंगाखाली काँग्रेसने पाकिस्तान बनवले. गांधींनी हिंदी राष्ट्राचे स्वप्न दिले; पण वास्तवात त्यांनी नव्या इस्लामी राष्ट्राची स्थापना केली. साठ वर्षांनंतर काँग्रेसने असा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या रूपाने उभा केला की, जो राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, असे म्हणेल. याच मनमोहनसिंग यांच्या सरकारने सच्चर समिती नेमून मुसलमानांना हवे ते वैधपणे देण्याची सोय केली. काँग्रेस सहजपणे मुसलमानांच्या दबावाला बळी पडते. काँग्रेस तेवढ्याच सहजपणे अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार आहे. अमेरिका जेथे मिळेल, तेथे मुसलमानांना ठोकून काढण्यासाठी उत्सुक आहे; पण आशियात मात्र हिंदूंना ठोकून काढण्यासाठी ती मुसलमानांचा पक्ष उचलून धरणार आहे. अशा अमेरिकेशी भारत सरकार अणूऊर्जासंधी करणार असून त्याचे समर्थन करतांना जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी `आम्ही मुसलमानच रहाणार आहोत’, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत. हिंदूंना आम्ही भूमी देणार नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले, तेव्हा त्यांच्या या विधानाचा निषेध एकाही काँग्रेसजनाने केला नाही.
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. ते इंग्लंडच्या आहारी केले होते; हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत.
देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व गहाण ठेवायला लावणारा अणूऊर्जासंधी नकोच !
अणूऊर्जासंधीने वीज मिळेल, या प्रकाशात विदर्भातील दारिद्र्य पीडित मुलांना अभ्यास करून आयुष्य घडविता येईल, हे सांगायला श्री. राहुल यांची आवश्यकता नाही. अणूपासून वीजोत्पादनास कोणाचा विरोध नाही. त्यासाठी भारताची सुरक्षितता आणि सार्वभौमता गहाण टाकण्यास देशभक्तांचा विरोध आहे; कारण जी नवी वीज मिळेल, तिच्या प्रकाशात अभ्यास कोणता करायचा ते ठरवण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना असणार नाही. त्यांना इस्लामचा अभ्यास करता येईल. ख्रिस्ती तत्त्वांचा अभ्यास करता येईल; पण हिंदु संस्कृतीचा अभ्यास प्रतिगामित्वाचा उपक्रम म्हणून त्याज्य समजण्यात येईल; म्हणून अणूकरार अत्यंत सावधपणे स्वीकारावा लागणार आहे. हिंदुहितरक्षण या एकमेव कसोटीवर प्रत्येक गोष्टीचा स्वीकार वा धिक्कार करावा लागणार आहे.
| मित्रांना पाठवा | 17 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार