स्वत:वर अन्याय झाल्यावर पेटून उठणारे पत्रकार जनतेच्या समस्यांविरुद्ध पेटून उठतील तो सुदिन !
चिपळूणमधील तीन पत्रकारांना हातभट्टीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर पत्रकारांनी संघटित होऊन शहरातील १५ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची घटना दुर्मिळ व सामाजिक बदलाचे सुचिन्ह म्हणावी लागेल.
वास्तविक अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क व पोलीस खात्यांची असते; मात्र चिपळूणात हातभट्ट्यांचे पेव फुटले, तरीही ही दोन्ही खाती `खात’ राहिल्यामुळे व हातभट्टीवाल्यांनी पत्रकारांना मारहाण केल्यामुळे पत्रकार कोपले व त्यांनी कायद्याचे शस्त्र उचलले. पत्रकारांनी मनावर घेतले, तर त्यांची भूमिका किती मोलाची ठरू शकते, याचा प्रत्यय चिपळूणमध्ये एकापाठोपाठ घडणार्या या घटनांतून येत आहे.
पत्रकारांनी मानसिक मर्यादांचे उल्लंघन करावे !
हल्लीच्या पत्रकारांनी वृत्तपत्रांत बातम्या देणे, इथपर्यंतच स्वत:च्या कार्यकर्तृत्वाला कुंपण घातलेले आहे. वास्तविक मराठी पत्रकारितेसमोर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या पत्रकारितेतील दिग्गजांनी समाजप्रबोधनाचा एक मोठा आदर्श निर्माण केला. पत्रकार वृत्तपत्र चालवण्याच्या पलीकडे जाऊनही मोठी सामाजिक क्रांती करू शकतो, हे या प्रभृतींनी देशाला दाखवून दिले. चिपळूण येथील पत्रकारांनी सहकार्यांना मारहाण करणार्यांच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे धारिष्ट्य दाखवून पत्रकारांमधील वैचारिक क्रांतीचा एक नवा पैलू दाखवला आहे. अर्थात त्यांनी हीच कृती सहकार्यांना मारहाण केली म्हणून नव्हे, तर निखळ सामाजिक जाणिवेतून केली असती, तर त्याचे मोल आणखी वाढले असते. तरीही त्यांच्या कृतीतून इतरत्रच्या पत्रकारांनी बोध घ्यायलाच हवा; कारण अशा किंबहुना याहीपेक्षा गंभीर अशा अनेक बेकायदेशीर घटना गावोगावी, गल्लीबोळांत घडत असल्याचे अनेक पत्रकार अनुभवत आहेत; मात्र `बातमी देण्याच्या पलीकडे आम्ही काय करणार’, या मानसिक बंधनात त्यांनी स्वत:ला गुरफटून घेतले आहे. देशासमोरील संकटांकडे अशाच हतबल नजरेतून पहाणार्या साहित्यिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी `लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’, असे आवाहन साहित्यिकांच्याच व्यासपिठावरून केले होते. तेव्हापेक्षा आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती अधिक भयंकर आहे. राज्यकर्ते देश विकायला निघाले आहेत, दहशतवादी व नक्षलवादी यांनी देश पोखरला आहे, महागाई व भ्रष्टाचार यांच्यापुढे जनता हतप्रभ झाली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी केवळ बातम्या लिहिण्याच्या भूमिकेत रमणे, हा अप्पलपोटेपणा आहे. म्हणूनच सर्व मानसिक बंधने तोडून समाज बदलण्यासाठी पत्रकारांनी स्वत:ला नव्या भूमिकेत समाजासमोर आणले पाहिजे. गुन्हेगारी कृत्यांची झळ स्वत:ला बसल्यावर काय ते पाहून घेऊ, या भूमिकेत न रहाता, पत्रकारांनी दररोज दिसणारे अनेक गैरप्रकार उखडून टाकण्यासाठी पत्रकारितेतील भूमिकेचा वापर करावा ! याची अल्पशी सुरुवात चिपळूणमधील पत्रकारांनी केली, हे अनेक अर्थांनी बरे झाले.
पत्रकारांनी राज्यकर्त्यांनाच जाब विचारावा !
पत्रकारांना हातभट्टीवाल्यांनी मारहाण केल्यावर पत्रकार प्रशासनाच्या हात धुवून मागे लागले व चिपळूणमध्ये गावठी दारू करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त केला. तब्बल २५ ट्रक लाकूड वनखात्याने जप्त केले व रॉकेलचा मोठा साठाही शोधून काढला. हातभट्टीवाले व पोलीस यांचे सख्ख्य असूनही १६ हातभट्टीवाल्यांना अटक करणे पोलिसांना भाग पडले. चिपळूणमधील प्रकरणात गुन्हेगारांवर कारवाई करण्यात प्रशासन आज जी तत्परता दाखवत आहे, ती केवळ अब्रू वाचवण्यासाठी केला जाणारा खटाटोप आहे. कारवाईचा देखावा निर्माण करून पत्रकारांची सहानुभूती मिळवायची व प्रकरण दडपून टाकण्याची नामी शक्कल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांना अवगत आहे. मात्र पत्रकारांनी उद्ध्वस्त केलेल्या १५ हातभट्ट्या पोलीस व अबकारी खात्यांना का दिसल्या नाहीत, याचा जाब पत्रकारांनी राज्यकर्त्यांनाच विचारायला हवा !



