सनातन संस्था राजकारण्यांच्या याचक संस्कृतीला छेद देत स्वाभिमानी समाज निर्माण करत आहे ! – अरविंद विठ्ठल कुळकर्णी
गडकरी रंगायतनमध्ये बाँबस्फोटप्रकरणी काँग्रेसमधील सत्तांध कार्यकर्ते व नेते `सनातन संस्था’, `हिंदु जनजागृती समिती’ व `सनातन प्रभात’ यांच्यावर बंदी आणण्यासाठी रान उठवतील, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठांनी शक्ती संपादन करावी. बाँबस्फोटासारखे आरोप सनातन संस्थेवर झाल्यानंतर यत्किंचितही न डगमगता आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून सनातन प्रभातमधील सडेतोड लिखाण सुरूच राहिले, त्यात सत्याविषयी तडजोड न करता स्पष्टवक्तेपणा कायम राहिला. या संकटातून मुक्त होण्यासाठी कोणाकडे लाचारी पत्करली नाही. त्यामुळेच समाजातील सर्वसामान्यांपासून ते विचारवंतांपर्यंत सगळयांचा `सनातन संस्थेला’ पाठिंबा मिळाला. `अध्यात्मविद्येचे जे मनापासून अध्ययन करतात, त्यांना देणारा आणि घेणारा परमेश्वर असतो’, हा विश्वास निर्माण करून सनातन संस्था राजकारण्यांच्या याचक संस्कृतीला छेद देत अशा प्रकारचा स्वाभिमानी समाज निर्माण करत आहे. हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे; परंतु काँग्रेसला मात्र ही राष्ट्रावरील आपत्ती वाटत आहे !
सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्यावर ओरखडाही काढण्याची हिंमत होणार नाही, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी आतापासून कृतीप्रवण व्हावे !
गडकरी रंगायतन नाट्यगृहाबाहेर जो सौम्य बाँबस्फोट झाला, तो करणारी माणसे सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत किंवा नाहीत, यांपैकी काय ते न्यायालयात सिद्ध होईलच. जर ती माणसे सनातन संस्थेशी संबंधित आहेत, हे पोलिसांनी सिद्ध केले, तर काँग्रेस संस्कृतीतील सक्रीय आणि सत्तेपुढे सर्व तुच्छ मानणारे कार्यकर्ते आणि विचारवंत सनातन संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी करून रान उठवतील. सरकार ते निमित्त करून बंदी आणण्याची धमकी देऊ शकते. निदान पुष्कळ बंधने आणू शकते. ती वेळ हिंदुत्वनिष्ठांच्या कसोटीची ठरणार आहे. सरकारची आणि इस्लामधार्जिण्या काँगे्रसी समाजाची, `सनातन संस्था’, `हिंदु जनजागृती समिती’ आणि `सनातन प्रभात’ नियतकालिके यांच्या अंगावर ओरखडाही काढण्याची छाती होणार नाही’, असे शक्तीसंपादन हिंदुत्वनिष्ठांनी आतापासून केले पाहिजे.
भारताच्या भवितव्याची ज्यांना चिंता असेल त्या नागरिकांनी गेल्या महिन्याभरातील `सनातन प्रभात’चे अंक आवर्जून वाचावेत !
सुदैवाने असा शक्तीसंचय फार आटापिटा करावा न लागता करता येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. गांधीहत्येच्या वेळची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यांत खूप अंतर आहे. गांधीहत्येनंतर संघावर बंदी आणण्यात आली, तेव्हा ती अन्याय्य आहे, असे न डगमगता स्पष्टपणे सांगणार्या व्यक्ती आणि संस्था फारच थोड्या होत्या. हिंदूंवर दबावतंत्राचा प्रयोग कौशल्याने करण्यात नेहरू पारंगत होते. समाजवाद्यांना हाताशी धरून ब्राह्मण समाजात भीतीचे डोंगर उभे करण्याचा खटाटोप नेहरूंनी केला. आज नेहरू नाहीत. आज आहेत नेहरूंच्या नातसून सोनिया गांधी; भारतासारख्या प्राचीन, अवाढव्य आणि अभिमानास्पद परंपरा असलेल्या देशाचा कारभार सोनिया गांधींसारख्या एका परदेशी व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आला आहे. याची बहुजन समाजाला मनातून खंत आहे. सोनिया गांधीचे नेतृत्व तळागाळातल्या माणसांना मान्य नाही, हे हळूहळू लक्षात आले, तेव्हा हिंदुत्वनिष्ठांमधील विचारवंत किंवा पुढारी मंडळी मल्लासारख्या मांड्या आणि दंड थोपटीत आणि मारुतिरायांचा जयजयकार करत पुढे आली आणि त्यांनी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती काळाची गरज असल्याने त्यांचे रक्षण केले पाहिजे, अशी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. भारताच्या भवितव्याची ज्यांना चिंता आहे, अशा सर्वसाधारण नागरिकांनी गेल्या महिन्याभरातील सनातन प्रभातचे अंक वेळात वेळ काढून मुद्दाम वाचले पाहिजेत. अध्यात्माचे पाठबळ असेल तर माणूस निर्भीड बनू शकतो. याचे उदाहरण म्हणजे हे अंक आहेत. बाँबस्फोटाचे कोठेही समर्थन केलेले नाही. त्याचबरोबर बॉँबस्फोट केल्याचा आरोप झाला म्हणून घाबरून जाऊन कोठेही लाचारी पत्करलेली नाही किंवा बचावात्मक भूमिका घेतलेली नाही. अत्यंत वस्तूनिष्ठपणे प्रस्तूत बाँबस्फोटासंबंधीच्या बातम्या पहिल्या पानावर छापून येत आहेत. पहिल्या पानावर अनेक क्षेत्रांतील नामवंतांच्या मुलाखती छापून येत आहेत. त्या मुलाखतींचा आशय उत्साहवर्धक आहे. सुसंस्कृत आहे आणि मनाची प्रगल्भावस्था चित्रित करणारा आहे. पोलिसांनी आपले काम चोखपणे बजावावे, शेवटपर्यंत छडा लावावा, दोषींना शिक्षा व्हावी, अशीच भूमिका या मुलाखतींतून व्यक्त होत आहे. खोट्यानाट्या बातम्या छापून आरोपींविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही किंवा असे म्हटले, तर ते अधिक योग्य ठरेल की, आरोपींना सहानुभूती मिळावी; म्हणून खोट्यानाट्या बातम्या छापण्याचा उद्योग `सनातन प्रभात’ने केलेला नाही. न्यायालयीन लढाई लढण्याचा आरोपींना पूर्ण अधिकार आहे आणि तो अगदी वेगळा मुद्दा आहे.
ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत आनंदाचे कातस्थ जीवन जगणार्या माणसांसारखी राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारी सनातन संस्था !
`सनातन प्रभात’ हे सज्जनांनी दुष्टांविरुद्ध वापरावयाचे सात्त्विक; पण धारदार शस्त्र आहे. बाँबस्फोटाचे निमित्त साधून हे शस्त्र काँग्रेसी सरकार आणि काँग्रेस संस्कृतीत वाढलेले विचारवंत बोथट करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांना अपयश येत आहे; कारण सनातन प्रभात नियतकालिकांच्या मजकुरात कसलाही फरक पडलेला दिसत नाही. अध्यात्माच्या मार्गावरील साधकांना पाथेय किंवा शिदोरी म्हणून जे उपदेशपर किंवा मार्गदर्शनपर साहित्य नियमितपणे प्रसिद्ध होत असते, त्यांत थोडासुद्धा खंड पडलेला नाही. साधकांचे अनुभवही छापले जात आहेत. बाँबस्फोटांनी त्यांच्या उपासनेत विक्षेप आलेला नाही कि त्यांची एकाग्रता ढळलेली नाही. परमेश्वरावर नितांत विश्वास ठेवून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आनंदाचे व्रतस्थ जीवन जगणारी माणसे ही खरी राष्ट्राची संपत्ती असते. तशी संपत्ती निर्माण करण्याचे काम सनातन संस्था करत आहे.
सनातन संस्था निर्माण करत असलेला स्वाभिमानी समाज काँग्रेस संस्कृतीला देशावरील मोठी आपत्ती वाटते ! अध्यात्मविद्येचे जे मनापासून अध्ययन करतात त्यांना देणारा आणि घेणारा परमेश्वर असल्यामुळे अन्य कुणाकडे मागण्यासारखे त्यांना काही उरत नाही. त्यामुळे ते `न दैन्यं न पलायनम्’ अशा निर्भीड आणि निर्मोही अवस्थेत जगत असतात. अलेक्झांडरला अशाच विरक्त साधूपुरुषांची भीती वाटत होती. ज्यांना कोणाकडे काही मागायचे नसते, अशा उन्मुक्त लोकांचीच सत्ताधिशांना नेहमीच भीती वाटत असते. समोरच्या माणसाला काही नको असणे म्हणजे तुमची उपकृत करण्याची शक्ती कमी होणे. सगळया समाजाला लाचार करून अनिर्बंधपणे सत्ता भोगण्यात राजकारण्यांना रस असतो. हात पुढे न करणारी माणसे त्यांना शत्रूगत वाटतात. राजकारणी याचक संस्कृतीचे पुरस्कर्ते असतात. सनातन संस्था याचक संस्कृतीला विरोध करत असून साधक संस्कृतीचा पायंडा पाडत आहे, हे सत्ताधार्यांचे खरे दुखणे आहे. सनातन संस्था निर्माण करत असलेला स्वाभिमानी समाज ही काँग्रेस संस्कृतीला देशावरील मोठी आपत्ती वाटते. बाँबस्फोट हे आयते मिळालेले निमित्त आहे. ते झाले नसते तरी या ना त्या मार्गाने काँग्रेस संस्कृतीच्या पाईकांनी सनातन संस्थेचा छळ केलाच असता.
सनातन संस्थेचे प्रत्यक्ष आचरण पारदर्शक असणे, हेच संस्था दहशतवादी असल्याचा दावा करणार्यांना उत्तर आहे ! हे लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसाने सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हा विषय अधिक चांगला समजून घेण्यासाठी सावरकर आणि सेनापती बापट यांची उदाहरणे घेऊ. सावरकर क्रांतीकारकांचे मुकूटमणी. सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान त्यांनी निर्माण केले. युद्धाची इच्छाच हिंदूंच्या मनात निर्माण होणार नाही, अशा दुबळयांच्या पिढ्या ब्रिटिशांना भारतात निर्माण करावयाच्या होत्या. सावरकरांनी `१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहून सशस्त्र क़्रांतीनेच स्वातंत्र्य मिळवण्याचा विश्वास तरुणांमध्ये निर्माण केला आणि धिंग्रा, खुदिरामपासून नेताजी सुभाषचंद्रांपर्यंत क्रांतीकारकांची तेजस्वी परंपरा निर्माण केली; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर `अभिनव भारत’ ही आपली सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना त्यांनी विसर्जित केली. नवजात स्वातंत्र्याला यादवीसारखा शाप नाही, असे सांगून सावरकर म्हणाले की, `यापुढे बुलेटमधून नव्हे, तर बॅलटद्वारा परिवर्तन साधायचे आहे. ज्ञानाधिष्ठित, कर्तव्यनिष्ठ देशभक्तांचा समाज निर्माण करावयाचा आहे.’ सनातन संस्था तेच काम करत आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाविषयी लिहिलेले एखादे वाक्य संदर्भ न देता उद्धृत करून सनातन संस्था दहशतवादी असल्याचा दावा केला जात आहे. या संस्थेचे प्रत्यक्ष आचरण पारदर्शक आहे आणि तेच उत्तर पुरे आहे. कुराणातील अशी शंभर वाक्ये काढता येतील, जी हिंदु-मुस्लीम ऐक्याला बाधक आहेत. पाकिस्तानचे समर्थन करणारी गांधींची कितीतरी वाक्ये आहेत. त्याविरुद्ध विचारवंत मौन का बाळगतात ? तेव्हा गडकरी रंगायतनचा बाँबस्फोट ही इस्लामी दहशतवादाची आणि उद्दामपणाची प्रतिक्रिया या निष्कर्षाला येणे संयुक्तिक ठरेल. चिनी आक्रमणानंतर चौपाटीवरील सभेत सेनापती बापट म्हणाले, “खरे म्हणजे या नेहरूंना फाशीच द्यायला पाहिजे; पण मी वेदान्ती असल्याने शिक्षा घेण्याचे काम मी नेहरूंवरच सोपवतो. त्यांना लाज असेल, तर ते त्यागपत्र देतील.’ नेहरूंप्रमाणेच आजचे राज्यकर्ते स्वत:हून सत्तात्याग करत नाहीत आणि वेदान्ती संस्थेवर बाँबस्फोटाचा आरोप करून मोकळे होतात. `कालाय तस्मै नम:’ !



