सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्‍न अयोग्य ! – प.पू. आसारामजी बापू

 

सनातन संस्थेचे माहितीपत्रक उपस्थितांना दाखवतांना प.पू. आसारामजी बापू

पुणे, १२ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेचे साधक चांगले आहेत. त्यांचे उपक्रमही चांगले आहेत. सरकारने या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्‍न करणे अयोग्य आहे, असे उद्‌गार प.पू. आसारामजी बापू यांनी काढले. श्रीक्षेत्र आळंदीनजीक असणार्‍या केळगाव येथील त्यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन, तसेच दर्शन सोहळयाचे शेवटच्या दिवसाचे सत्र नुकतेच पार पडले.

त्या प्रसंगी सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. या सोहळयात हजारोंच्या संख्येने प.पू. आसारामजी बापू यांचे भक्‍त व शिष्य उपस्थित होते. प.पू. बापू पुढे म्हणाले, “सध्याचा काळच वाईट आहे; परंतु काळजी करू नका. चांगल्या कामात विघ्ने येतच रहातात; पण घाबरून जाऊ नका. चांगली कामे करणार्‍या संस्थांवर बंदी आणण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी आणण्याचा प्रयत्‍न केला गेला होता; परंतु काय परिणाम झाला ? आणखी संघटित होऊन संघाचे कार्य पुन्हा सुरू झाले. ज्या ज्या वेळी एखाद्या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्‍न होतो, त्या त्या वेळी त्या संस्थेचे कार्य आणखीनच वाढत जाते. कुठलीच संस्था संपत नसते. सध्या संतांवर नको ते आरोप केले जात आहेत. जगद्‌गुरु शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्यासारख्या सत्पुरुषावरही खोटे आरोप केले गेले. त्या वेळी मलाही सत्याग्रह करावा लागला; परंतु आज पाहिले, तर संतांवर आरोप करणार्‍यांच्या हातून सत्ता गेल्याचे दिसते.” या वेळी सनातन संस्थेतर्फे प.पू. आसारामजी बापू यांचा सनातन-निर्मित ग्रंथ अर्पण करून सन्मान करण्यात आला. प.पू. बापूंनी संस्थेच्या साधकांकडून सन्मान स्वीकारून सनातनचे साधक व्यासपिठावर उपस्थित असल्याचे सर्वांना सांगितले, तसेच सनातन-निर्मित ग्रंथ सर्वांना दाखवले.

दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply