अधिकार्‍यांनी परप्रांतियांना नियमानुसार परवाने न दिल्यास `मनसे पद्धती’ने आंदोलन – राज ठाकरे

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – उत्तरप्रदेश व बिहार येथून बेकायदेशीरपणे येणार्‍या लोंढ्यांच्या तावडीत संपूर्ण महाराष्ट्र सापडला आहे. या परप्रांतियांना शिधापत्रिका, रिक्शा व टॅक्सी यांचे परवाने, वास्तव्याचा दाखला आदी परवाने देतांना चिरीमिरीसाठी स्वत:ला विकू नका. तुमच्या या कृत्यांनी यापूर्वी परप्रांतियांची दादागिरी राज्याने अनुभवली आहे.

यापुढे परप्रांतियांना असे परवाने देतांना सर्व नियम आणि कायदे यांचे पालन करा. माझा पक्ष व मी या अधिकार्‍यांच्या पाठीशी असू. या संबंधित अधिकार्‍यांनी त्यांचा कारभार महिन्याभरात सुधारावा अन्यथा मनसेच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी दिला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहातील मनसेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यास संबोधित करतांना श्री. राज ठाकरे म्हणाले, “उत्तरप्रदेश व बिहार येथून येणार्‍यांना सर्व प्रकारचे परवाने अधिकार्‍यांच्या मदतीने सहज मिळतात. मग हे परप्रांतीय शासनाच्या आरक्षित जागा व पदपथ यांवर झोपड्या बांधून बेकायदेशीर धंदे सुरू करतात. नंतर बेकायदेशीर देशी शस्त्रे आणून त्यांची दादागिरी सुरू होते. राजकीय पक्षांत शिरकाव करत ते आमदार व खासदार बनतात. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस हे राज्य त्यांच्या ताब्यात जाईल व पुढची पिढी आपल्याला कदापी माफ करणार नाही, असा इशारा असणारे निवेदन राज्यातील
सर्व अधिकार्‍यांना पक्षाच्या पदाधिकार्‍यांमार्फत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य केंद्रशासनाकडे भरत असलेल्या करापैकी फार थोडा पैसा राज्याला मिळतो. उलट उत्तरप्रदेश व बिहार यांना अधिक पैसा मिळत असूनही तेथे विकास नाही.”

दैनिक सनातन प्रभात

जम्मूस्थित राजकीय पक्षांची स्वतंत्र जम्मू राज्याची मागणी

जम्मू, ११ जुलै (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमधील राज्यकर्ते काश्मीरला केंद्रबिंदू ठरवून राज्यकारभार करत असल्याची टीका करत जम्मूस्थित राजकीय पक्षांनी स्वतंत्र जम्मू राज्याची मागणी केली आहे. `मुसलमानांच्या दबावाला बळी पडून अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली जमीन काढून घेण्याचा काँग्रेस सरकारने दिलेला आदेश जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येईल’, असा इशारा प्रजा परिषदेचे अध्यक्ष श्री. चंदरमोहन शर्मा यांनी दिला आहे.

जम्मूतील जनतेने काश्मीरकेंद्रित राजकारणाच्या विरोधात लढा उभारला पाहिजे. या भेदभावाच्या विरोधात जम्मूमधील जनतेने गेल्या ६० वर्षांपासून लढा दिलेला आहे. जम्मूतील राजकीय नेत्यांनी काश्मीरच्या नेत्यांपुढे नेहमीच मान तुकवली आहे. त्यामुळेच जम्मूला विकासाला मुकावे लागले आहे. जम्मूतील जनतेच्या अस्तित्व टिकवायचे असल्यास जम्मूसाठी वेगळे राज्याचा दर्जा हाच त्यासाठी एकमेव पर्याय आहे, असे जम्मू टायगरचे अध्यक्ष श्री. कुलजित सिंग यांनी सांगितले. `जम्मूच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगळया राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही लढा देणार आहोत व त्यासाठी शक्य असल्यास ३७० वे कलम रद्द केले तरी चालेल’, असे श्री. सिंग यांनी सांगितले.

दैनिक सनातन प्रभात

मुंबईला केवळ १०० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा जलाशयांत शिल्लक

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरावरील पाणीपुरवठ्याचे संकट म्हणजे धर्माधिष्ठित राज्यकारभाराचा अभाव !

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – मुंबईत पाऊस लांबला आहे. जलाशयांतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. पालिकेने १ जुलैपासून १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. सध्या मुंबईला केवळ १०० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे.

त्यामुळे येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस पडून जलाशयांतील पाण्याच्या पातळीत अपेक्षित वाढ न झाल्यास पाणीकपात १५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. आता पावसासाठी देवाला साकडे घालण्याशिवाय मुंबईकरांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. (संकटे कोसळतात, तेव्हा देवाला साकडे घालणे, म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहे. संकटकाळी देव धावून यावा, असे वाटत असेल, तर दररोज सातत्याने साधना करायला हवी ! – संपादक) जलाशयांत जोपर्यंत पुढील पावसाळा (जून २००९ चा) सुरू होईपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत मुंबईला पाणीकपातीला तोंड देणे भाग आहे.
(राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), आपापसांत लढाया होणे व शत्रूने राज्य करणे, अशी विविध प्रकारची संकटे देशावर येतात.)

दैनिक सनातन प्रभात