जम्मूची व्यक्ती काश्मीरचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करणारे आझाद इच्छापूर्तीसाठी झटतील का ?
भारतीय सैन्याला काश्मीरमधून हाकलून लावण्यासाठी काश्मीरचे मुसलमान चळवळ करणार आहेत. याला उत्तर म्हणून शिवभक्तांनी महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात अमरनाथ यात्रा साहाय्यता समिती स्थापन केली पाहिजे. यात्रेसाठी दिलेली ४० हेक्टर भूमी मानाने परत मिळेपर्यंत महाराष्ट्रात कल्पकपणे आंदोलन चालले पाहिजे. ही भूमी परत मिळेपर्यंत `ॐ नम: शिवाय ।’च्या जपाने सर्व मंदिरे निनादून गेली पाहिजेत.

जम्मू आणि काश्मीर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सत्तेचा त्याग करण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी जे भाषण विधानसभेत केले, ते मुंबईतील वृत्तपत्रांनी नीट दिलेले नाही. “भ्रष्टाचारमुक्त आणि आतंकवादमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे अडीच वर्षे आम्ही करत आलो, हाच आमचा मुख्य अपराध ठरला”, असे सांगून ते म्हणाले, “एका जिल्ह्यात ९७ कोटी रुपये खर्चून सरकारी रुग्णालय बांधले जाणार होते. ते ५७ कोटींत बांधता येते, असे दाखवून जनतेचे ४० कोटी रुपये मी वाचवले. त्यामुळे ज्यांना ४० कोटी खायचे होते, ते माझे शत्रू झाले. अशा अनेक शत्रूंनी एकत्र येऊन माझे सरकार पाडले आहे. अमरनाथ यात्रेला दिलेली भूमी हे निमित्त आहे. ही यात्रा सुखरूप पार पडावी, अशीच माझी इच्छा आहे. अमरनाथ मंदिराला भूमी देतांना अवैध व्यवहार झालेला नाही आणि या भूमीचा वापर करतांना मंदिराच्या व्यवस्थापनाने काहीही अनुचित काम केलेले नाही”, असे स्पष्ट करून आझाद म्हणाले, “धर्म पुढे करून राजकारण करता कामा नये. खरे म्हणजे जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री यापुढे जम्मूतून यायला हवा. बराक ओबामा जर अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो, तर काश्मीरचा मुख्यमंत्री जम्मूचा का असू नये ? जम्मूचा माणूस काश्मीरचा मुख्यमंत्री झाला, तर ती गोष्ट सगळयांनी आनंदाची मानली पाहिजे.” गुलाम नबी आझाद हे राजकारणात मुरलेले जुने काँग्रेसवादी असल्याने सोय-गैरसोय पाहून संभाव्य मतदारांना आकर्षित करणारे भाषण ते करू शकतात. तसे हे असू शकते; पण या वेळी आझादांना संशयाचा लाभ द्यावा, असे वाटते. `काश्मीरचा मुख्यमंत्री हिंदु पाहिजे’, असे त्यांच्या तोंडून वदवले गेले आहे, ते खाली पडू न देता उचलून धरले पाहिजे आणि प्रत्यक्षात आणून दाखवले पाहिजे. त्याकरता आझादांचेच सहकार्य आपण घेतले पाहिजे. ते विदर्भातील वाशीम मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. म्हणजे ते मराठीच आहेत, असे समजून महाराष्ट्रातील शिवभक्तांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे. अमरनाथ यात्रेसाठी दिलेली भूमी परत घेण्यासाठी फुटीरतावादी संघटनांनी दबाव आणला. भूमी परत घेतली. सरकार पाडले आणि भारतीय सेनादलांना दिलेली भूमी परत मिळवण्यासाठी आंदोलन छेडण्याची घोषणा केली. भारतीय सैन्याला काश्मीरमधून हाकलून लावण्यासाठी काश्मीरचे मुसलमान चळवळ करणार आहेत. याला उत्तर म्हणून शिवभक्तांनी महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात अमरनाथ यात्रा साहाय्यता समिती स्थापन केली पाहिजे. यात्रेसाठी दिलेली ४० हेक्टर भूमी मानाने परत मिळेपर्यंत महाराष्ट्रात कल्पकपणे आंदोलन चालले पाहिजे. ही भूमी परत मिळेपर्यंत `ॐ नम: शिवाय ।’च्या जपाने सर्व मंदिरे निनादून गेली पाहिजेत. हे आंदोलन यशस्वी झाले की, काश्मिरी हिंदूंची मुसलमानांनी लुबाडलेली भूमी परत मागण्याचे धैर्य हिंदूंच्या हृदयात गोळा होईल. ते झाले की, या काश्मिरी हिंदूंचे अत्यंत सन्मानाने काश्मिरात त्यांच्या मूळ जागी पुनर्वसन व्हावे, म्हणून भारतभर चळवळ उभी करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल. ते आंदोलन यशस्वी झाले की, एखाद्या गुणी काश्मिरी हिंदूला या राज्याचा मुख्यमंत्री करता येईल. गुलाम नबी आझाद यांनीच त्या मुख्यमंत्र्याचे नाव सुचवावे, असे तेव्हा सांगता येईल. एवढे केले की, पाककडे असलेला काश्मीर परत आणता येईल. ते केले की, मुसलमानांची समस्या सौम्य होईल. एवढे सगळे `ॐ नम: शिवाय ।’च्या नामजपातून साध्य होईल. तेवढी श्रद्धा पाहिजे. श्रद्धेतून इच्छाशक्ती बळकट होईल. मग समस्या राहिली, तरी त्रासदायक रहाणार नाही. – सुघोष


