महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना हटवावे ! – आमदार दिवाकर रावते

मराठी विषयाच्या पुस्तकातील शेकडो चुका म्हणजे मातृभाषेची अवहेलना करण्याचा अक्षम्य गुन्हा !

 

इयत्ता दहावीच्या `कुमारभारती’ या पाठ्यपुस्तकात २२२ चुका !

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – इयत्ता दहावीच्या यंदाच्या `कुमारभारती’ या नावाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात वेगवेगळया प्रकारच्या तब्बल २२२ चुका आढळल्या आहेत.

(दहावीच्या पाठ्यपुस्तकात एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे शिक्षण मंडळ ! – संपादक) इतकेच नव्हे, तर त्यात राष्ट्रपुरुषांचा अवमानही करण्यात आला आहे. (अशा पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपुरुषांबद्दल आदर काय निर्माण होणार ? असे करून आदर्श व्यक्‍तीमत्त्वांबद्दलची विद्यार्थ्यांची धारणा नासवून त्यांना दिशाहीन करणार्‍या संबंधित व्यक्‍तींवर शासन काय कारवाई करणार आहे ? – संपादक) या निषिद्ध प्रकाराला राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजयशीला सरदेसाई यांचा मनमानी कारभार कारणीभूत असून त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आमदार
श्री. दिवाकर रावते यांनी काल शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणी वार्ताहर कक्षात श्री. रावते पत्रकारांना म्हणाले की, यापूर्वी शिक्षण मंडळाने तयार केलेल्या पुस्तकात ३५० चुका झाल्या होत्या. परिणामी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. वसंत काळपांडे यांना पदावरून हटवण्यात आले होते. आता तोच न्याय येथेही लावणे क्रमप्राप्‍त ठरते. या पुस्तकात शुद्धलेखनाच्या चुका १५०, तपशिलाच्या चुका २०, स्वाध्यायाच्या चुका २०, शब्दार्थ व टीपा यांच्या १२, शासनावर टीका व शासनविरोधी मजकूर ८, गंभीर व आक्षेपार्ह चुका ५, शब्दकोश व `हे शब्द असेच लिहा’ या मजकुरातील चुका ७ अशा एकूण २२२ चुका आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे लिखाण या पाठ्यपुस्तकात आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, संत तुकडोजी महाराज या संतांची पूर्ण नावे दिलेली नाहीत. (अशा प्रकारे संतांचे नाव-गाव प्रसिद्ध करायचे नाही, त्यांच्याबद्दलच्या माहितीपासून नव्या पिढीला वंचित ठेवायचे व नंतर काही वर्षांनी `२१ व्या वर्षी समाधी घेणार्‍या ज्ञानेश्‍वरांनीच ज्ञानेश्‍वरी लिहिली का, अमूक अभंग अमूक संतांचेच आहेत का’, असे समाजाला संभ्रमात टाकणारे प्रश्‍न उपस्थित करून पुन्हा संशोधनादी कर्मकांडे सुरू करायची, असे हल्ली सुरू आहे. असा कोलाहल करून समाजाची संतांवरील श्रद्धा कणाकणाने कमी करून नंतर ती पूर्ण नष्ट करण्याचे हे कारस्थान आहे. प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सनदशीर मार्गाने तीव्र विरोध करायला हवा ! – संपादक) व्याकरणाच्या चुका, पाठ्यपुस्तकाचा अयोग्य आकृतीबंध, कठीण शब्दांचे चुकीचे अर्थ, स्वाध्यायात गोंधळ, लेखकांच्या परिचयात चुका आदी चुका दुर्लक्षित करणे निश्चितच योग्य ठरणार नाही. गेली ३ वर्षे हा सावळागोंधळ सुरू असूनही राज्यशासन व शालेय विभाग निष्क्रीय असल्याचे प्रत्ययास येते.
टीप : दहावीच्या सदर पाठ्यपुस्तकातील चुका लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

साभार  : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply