६०व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने २० ते २६ जानेवारी या कालावधीत `सैनिक सप्ताह’ राबवत आहोत. सर्वसामान्यांचा `राष्ट्र व धर्म’ यांबाबत अभिमान वाढावा म्हणून भारतातील सैनिकांचे युद्धासंदर्भातील अनुभव या सप्ताहाच्या निमित्ताने देत आहोत.
माजी कर्नल श्री. भिकाजी महादेव निकम हे सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथील असून ते वयाच्या १८ व्या वर्षी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले. सातारा येथील रयत संस्थेच्या सयाजीराव महाविद्यालयात इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला. लहान वयातच स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या श्री. भिकाजी यांनी गोर्या इंग्रज अधिकार्यांची चीड येत असे. त्यातूनच त्यांनी बालवयातच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस अगोदर एका सहकार्यासबोत रात्रीच्या वेळी नागठाणे येथे एका गोर्या अधिकार्याच्या चालत्या गाडीवर दगड मारून काच फोडली व डोंगरात जाऊन लपून बसले होते. सैन्यात कर्नल पदावर ३८ वर्ष सेवा केलेले व वीरचक्र प्राप्त झालेले श्री. भिकाजी निकम हे अद्यापही स्वत:चे जीवन समाजोपयोगी कार्यासाठी घालवत आहेत. ते `साप्ताहिक सनातन प्रभात’चे वाचकही असून संस्थेच्या कार्याची त्यांना ओळख आहे. दर दहा वर्षांनी लढाई हवीच, नाहीतर सैन्याची धमक लक्षात येत नाही, अशी भूमिका असणारे श्री. निकम यांचे विचार येथे पाहू .
सैनिक होऊन युद्ध लढणे हेच स्वप्न उराशी बाळगणे !
पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले सर्वजण युद्धातील अनुभव सांगत असत. त्याचप्रमाणे माझा चुलत भाऊ कर्नल आर्.डी. निकम व मामा यांनी पहिल्या व दुसर्या महायुद्धाच्या वेळी सैन्यात असतांना त्यांचे अनुभव ऐकून मी भारावून जात व त्यातूनच मी सैन्यात जाण्याचे ठरवले. ते ऐकल्यावर आपणही सैन्यात जायला हवे, बंदूक चालवायला यायला हवी, सैन्यात भरती झाल्यामुळे शत्रूशी लढण्याचा विलक्षण अनुभव अनुभवता येईल, असेच ध्येय ठेवून मी व माझे दोन मित्र सैन्यात भरती झालो होतो.
शत्रूच्या हाती जिवंत सापडायचे नाही, हेच सैनिकाचे ध्येय !
१९६६ साली विद्रोही नागा लोकांबरोबर झटापट झाली. आमची आठ जणांची तुकडी नागलँडमध्ये शस्त्रास्त्रे व दारुगोळा गाडीमधून घेऊन जात होती. अचानक नागा लोकांनी जंगलातून रात्रीच्या वेळी गाडी जात असतांना हल्ला केला. त्यानंतर आठ जणांमध्ये दोन विभाग करून आरडा-ओरडा करून शत्रूला आम्ही भरपूर जण आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी विद्रोही नागांबरोबर लढतांना एक जवान गोळी लागून जखमी झाला. रात्रीच्या वेळी जंगलामध्ये कोण कोठे आहे, हे लक्षात येत नव्हते. सर्व जण आम्ही विखुरलेल्या स्थितीत होतो. मात्र सर्वांना एकच नियम होता; शत्रूच्या हाती जिवंत लागायचे नाही. अशा स्थितीत दिवस उजाडायची वाट पहात होतो. मागून संपर्क करून अतिरिक्त कुमक मागवल्यावर नागा विद्रोही पळून गेले. त्या वेळी नागा विद्रोह्यांविरुद्ध धाडसाने प्रतिहल्ला करून दारूगोळा व शस्त्रांचा बचाव करण्यास जखमी जवानांचे प्राण वाचवले, या कामासाठी भारत सरकारने राष्ट्रपतींचे शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले.
राज्यकर्त्यांच्या दुबळेपणामुळे
चीन-भारत युद्धात विनाकारण माघार !
भारत-चीन युद्धाच्या वेळी तुकडीमध्ये हवालदार पदावर होतो. माझ्या सोबत असणार्या तुकडीला जंगलातून प्रवास करावा लागला. आम्ही आठ दिवस चालत प्रवास करत होतो. रेशन पुरेसे नसल्याने सोबत असलेला तांदूळ पोकळ बांबूमध्ये मीठ टाकून शिजवायचो व जंगलात जी श्वापदे मिळत त्यांना भाजून खायचो. जंगलातून पायांना जळवा लागून त्या रक्त शोषण करायच्या. तुकडीतील कोणी आजारी पडला किंवा मेला तरी आठ जणांच्या तुकडीतील सातही जवान मदत करत. अशा परिस्थितीला सामोरे जाऊनही विनाकारण माघार घ्यावी लागली, हे दुर्दैव !
सैन्यामध्ये विविध ठिकाणी सेवा करता येणे !
मध्यप्रदेश (निचम), काश्मीर, लडाख, नेफा (अरुणाचलप्रदेश), मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, आसाम, नागालॅण्ड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था, निवडणूक शांतता राखण्यासाठी व दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. चीन-भारत युद्धाच्या वेळी हवालदार पदावर सेवा करत होतो. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पंजाबमध्ये असतांना नेतृत्व करण्याचा योग आला होता. त्यानंतर सैन्यामध्ये १६ वर्षे सर्वोत्तम सेवा केल्याबद्दल भारत सरकारने राष्ट्रपती विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सैन्यात असतांना घरातल्यांचा पत्राद्वारे संपर्क सहा महिन्यांनंतर व्हायचा; तर दोन वर्षांनंतर घरातल्यांची तोंडे पहाण्याचा योग यायचा.
भारत-पाक व पाक-बांगलादेश युद्धात सहभाग !
पाकिस्तान-बांगलादेश युद्धाच्या वेळी मी तुकडीचा निरीक्षक होतो. `सेंट्रल रिझर्व्ह फोर्स’च्या तुकडीचा मी निरीक्षक म्हणून सेवा करत होतो. त्रिपुरा भागांतून आमची तुकडी शत्रूवर हल्ला करत होती. त्या वेळी बांगलादेशातील जनतेचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे हे युद्ध आम्ही लढू शकलो. बांगलादेशातील नागरिकांसोबत रहातांना भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत झाली. तेथील नागरिकांनी बर्याच वेळा रेशनचाही पुरवठा केला. भौगोलिक परिस्थती योग्य असल्याशिवाय सैनिक युद्ध जिंकू शकत नाहीत. पाकिस्तानी शत्रूवर हल्ला करतांना स्थानिकांची मदत मिळत असल्याने आमचे सैन्य शत्रूवर चढाई करून पुढे-पुढे जात होते. भारत-पाक युद्धाच्या वेळी पठाणकोट भागांतून युद्धात सहभागी होण्याचा योग आला. त्या वेळी समोरील शत्रूला मारा किंवा मरा, अशीच भूमिका आम्ही सैनिकांनी बाळगली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी आम्हा सैनिकांचे मन कठोर ठेवूनच उतरलो होतो. या वेळी पाकिस्तानला नामोहरण करूनही पुन्हा त्यांना भूभाग द्यावा लागला, हे दुर्दैव.
सेवा काळात सरकारने विविध गोष्टींमुळे गौरवले !
नोकरी कार्यकाळात अत्यंत प्रामाणिक धडाडीने अचूक निर्णय घेऊन विशेष काम केले, याबद्दल सन १९६६ मध्ये भारत सरकारने विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले.
सन १९८४ मध्ये स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली येथे पंजाबी लोकांच्या विरोधात उसळलेल्या दंगलीमध्ये जाळपोळ, मारामारी व लुटालूट चालू असतांना २०० बस व ट्रक मध्ये अडकून पडलेल्या हजारो स्त्री-पुरुष आणि बालकांची सुखरूप सुटका करून त्यांना पंजबामध्ये पोहोचवले. या कार्याबद्दल मला पतियाळा पोलीस उपअधीक्षक, जिल्हाधिकारी व जनता यांनी माझा सत्कार केला.
उग्रवाद फोफावण्यास राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे कारणीभूत !
दिल्लीवरून आदेश निघाल्यानंतर कारवाई होते. आदेश देणारे दारू पिऊन व वातानूकुलित खोलीमध्ये बसून स्थानिक परिस्थितीची पारख नसतांना आदेश देत असतात. कुठेही केव्हाही `पेट्रोलिंग’ करण्यास सांगतात. खाओ-पिओ, अशीच स्थिती असते. गेली दोन दशके उग्रवाद संपवण्याचा प्रयत्न करूनही तो संपला नाही; कारण आजपर्यंत तेथे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. दिल्लीवरून आदेश आल्यानंतर गोळी झाडली जाते. तोपर्यंत हातावर हात घालून बसावे लागते, अशी स्थिती आहे. नागा उग्रवाद्यांच्या विरोधात कारवाई करतांना तेथील नागा लोकांमध्ये मिसळून रहावे लागे. आजपर्यंतच्या नेत्यांमध्ये लालबहाद्दूरशास्त्री हेच खरे व कर्तव्यदक्ष नेता होते.
हेरखात्याचे अयोग्य कामकाज !
हेरखाते योग्य सेवा बजावत असते, तर गेल्या दशकात झालेले अयोध्या, संसद यांवर हल्ले झाले असते का ? सीमेवर घुसखोरी होतच रहाते. अधिकारी वर्गाला पैसे देऊन ती केली जाते. एकादा सैनिक वा अधिकारी पैसे घेण्यास तयार नसेल वा देशाची एकनिष्ठ रहात असेल, तर त्याची बदली वरिष्ठांना सांगून करायची, अशी धोरणे सैन्यातील सीमावर्ती भागातील वरिष्ठ अधिकारी राबवतात. त्यामुळे प्रत्येकामध्ये राष्ट्राभिमान जागृत होत नाही तोपर्यंत हेरखाते असो व सीमेवर कितीही सैनिक ठेवले, तरी देश सुरक्षित रहाणार नाही किंवा त्या सैनिकांचा सुरक्षेच्या दृष्टीने काहीही फायदा नाही.
शत्रूपासून नव्हे, तर घरातीलच घरफोड्यांपासून पहिल्यांदा जनतेला मुक्त करा !
आम्ही देशाच्या शत्रूशी लढलो; मात्र घरात असणारी घाण म्हणजे गावातील ग्रामसेवकापासून ते दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्यापर्यंत सर्व ठिकाणी भ्रष्टाचार फोफावला आहे. या घाणीकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. घरची घाण काढून टाकल्याशिवाय बाहेरच्या शत्रूशी युद्ध करून काय फायदा ? एकीकडे भ्रष्टाचार फोफावत असतांना दुसरीकडे `अल्ला हो अकबर’चे प्रस्थ वाढले आहे. त्यांचे मंत्री-संत्री झाले आहेत. सध्या सुरू असलेले हे गृहयुद्ध संपण्याजोगे वाटत नाही. वाघाचे कातडे पांघरलेल्यांकडून काय अपेक्षा करणार ? हे करण्यासाठी सर्वांसाठी `एक राष्ट्र व एक कायदा’ झालाच पाहिजे. (उदा. नसबंदी सर्वांसाठीच लागू व्हायला हवी.)
राज्यकर्त्यांनो, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करा, तरच देशहित होईल !
लढाई सुरू झाल्यावर सरकार सैनिकांना लढण्यापूर्वी सहानुभूती देणार, मंत्री येणार, स्वतंत्र्याची गाणी गाणार, असे चालते. एकादा मंत्री, संत्री झाला की, तो करोडपती होतो. समाज त्याच्या मागे धावत असतो. लालबहाद्दूर शास्त्री, पटेल, हे खरे नेत होते. आजपर्यंत गावाचा विकास व्हावा, यासाठी ३४ वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर गावातच रहाण्याचा निर्णय घेतला. घराचा व स्वत:च्या आर्थिक प्रगतीचा विचार केला नाही. गावामध्ये शाळा काढावी व गावात समाजोपयोगी गोष्टी कराव्यात यासाठी राहिलो. मात्र सध्याचे मंत्री-संत्री असे समोपयोगी कार्य करून देतील का ? आताच्या राज्यकर्त्यांना समाजसेवा करायची असेल, तर घरावर तुळशीपत्र ठेवून करा, तरच देश प्रगती करेल. जनताही करोडपती झालेल्या मंत्र्याच्या पाठिमागे लागते, हे दुर्दैव. सध्या निवृत्तीनंतर जीवनास आवश्यक असणारी गरज पाणी यासाठी जलसंशोधन व भूगर्भसंशोधन शास्त्राचा सखोल अभ्यास करून सातारा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर व पुणे या ठिकाणी भूगर्भातील पाण्याचा स्रोत अचूक दाखवून लोकांना विंधन विहीर, बोअरद्वारे शेतीला व पिण्यासाठी पाणी दाखवण्याचे मार्गदर्शन करून लोकांचे दैनंदिन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहे.
दर दहा वर्षांनी लढाई हवीच !
प्रत्येक क्षणी सैनिकांनी युद्धस्थितीत राहायला हवे. कारण नुसते शस्त्र असून उपयोग नाही, तर ती चालवण्याचे प्रशिक्षण हवे. तसे झाल्यास सैनिक युद्धकाळात चोख भूमिका बजावू शकतो. नाहीतर सैनिक युद्धाला निर्भयतेने सोमेरे जाऊ शकत नाही; कारण प्रत्येक युद्ध मनाच्या स्तरावर पहिल्यांदा लढायला हवे. आज भारतीय सैनिकांची तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. तलवार मॅनात नको, तर हातात हवी ! त्यानुसार सैनिकांचे शस्त्र सतत तळपावण्यासाठी दर दहा वर्षांनी लढाई हवीच. तरच सैन्य कुशल व बलसंपन्न रहाते.




