१. श्राद्ध करण्याचे उद्देश
२. श्राद्धाचे महत्त्व व आवश्यकता
३. श्राद्धविधीचा इतिहास
४. श्राद्धामुळे होणारे फायदे
५. श्राद्ध कधी करावे ?
६. श्राद्धाच्या देवता
७. श्राद्धाचे प्रकार
८. श्राद्धाची तयारी
९. श्राद्धाची परिभाषा
१०. तर्पण
११. पितृतर्पण
१२. अविधवा नवमी
१३. इतर माहिती
१४. अधिक माहिती वाचा
१. श्राद्ध करण्याचे उद्देश
अ. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना मदत करणे
आ. आपल्या कुळातील ज्या मृतात्म्यांना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.
इ. काही पितर कुकर्मांमुळे पितृलोकात न जाता भूतयोनीत जातात. त्यांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे.
२. श्राद्धाचे महत्त्व व आवश्यकता
अ. `देव, ऋषी व समाज या तीन ऋणांबरोबरच पितृऋण फेडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते.
आ. पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड व उदक) दिल्यावरच सुखी व संतुष्ट होतात. यासंदर्भात `पुत्र कोणाला म्हणावे’, याविषयी महाभारतात दिलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे -
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुत: ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्त: स्वयमेव स्वयंभुवा ।। – महाभारत
अर्थ : मुलगा हा आपल्या पितरांचे (पूर्वजांचे) पुं नामक नरकापासून रक्षण करतो; म्हणून त्याला स्वत: ब्रह्मदेवानेच `पुत्र’ म्हटले आहे.
या श्लोकानुसार पितरांना सद्गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी व पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी यांसाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत. स्वत:ला पुत्र म्हणवणार्यांचे ते कर्तव्यच आहे, हे स्पष्ट होते.
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)
इ. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम । – तैत्तिरीय उपनिषद १.११
अर्थ : देवकार्य व पितृकार्य यांत कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.
ई. श्राद्धविधी न करणार्यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे.
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रिया: । – श्रीमद्भगवद्गीता १.४२
अर्थ : अशांचे (श्राद्धविधी न करणार्यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय होत नाही.’
उ. सुमंतुऋषी सांगतात, `श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करम् उदाहृतम् ।’, म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कधी टाळू नये.
ऊ. ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, `देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.
ए. ब्रह्मपुराण सांगते, `जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्त करते. श्राद्ध करणार्याच्या कुळात कोणी दु:खी रहात नाही.’
ऐ. एखाद्या मृतात्म्याची `आपले श्राद्ध व्हावे’, अशी इच्छा असली व अपेक्षितांकडून ती पूर्ण झाली नाही, तर वासना- अतृप्तीचे दु:ख त्याला होते. असा एखादा मृतात्मा पिशाच (आसुरी शक्तीचा एक प्रकार) होऊन श्राद्ध न केल्याचा राग नातेवाइकांवर काढण्याची शक्यता असते.
ओ. मृत्यूपूर्वी एखाद्याला, `श्राद्धामध्ये काही अर्थ नाही; म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको’, असे वाटत असेल व मृत्यूनंतर श्राद्ध न केल्याने, `आपण अडकलो आहोत’, अशी जाणीव झाली; तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दु:खी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.
औ. एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो, उदा. आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला, तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे. हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा न टिकणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, लग्न झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे व कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे. श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट झाल्याने त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे, तसेच मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते.
क. श्राद्ध केल्याने पितरांना गती मिळते, तरी ते सातत्याने करणे आवश्यक :
मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे ते अन्न त्याच्या सूक्ष्म-देहाला वर्षभर पुरते. जोपर्यंत इच्छा-आकांक्षा असतात, तोपर्यंत ती मृत व्यक्ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवते. श्राद्ध केल्याने त्यांची इच्छापूर्ती तर होतेच, तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. पूर्वजांची एखादी जरी वासना तीव्र असली, तरी श्राद्धविधींद्वारे मिळणारी ऊर्जा त्यांच्या वासनापूर्तीसाठीच वापरली गेल्याने पितरांना पुढे जाण्यास गती मिळत नाही. त्यामुळे सातत्याने श्राद्ध केल्याने हळूहळू त्यांची वासना कमी होत जाऊन ते गतीस प्राप्त होऊ शकतात. तसेच शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून दरवर्षी श्राद्ध करणे, हेच योग्य आहे.
ख. पितरांची पातळी ५० टक्के आहे, असे माहीत असले, तरी श्राद्धपक्षादी विधी करण्याची कारणे
१. कलीयुगात रज-तमाच्या आधिक्यामुळे साधना करणार्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अतृप्त इच्छांमुळे जिवाला पुढची गती मिळत नाही, तसेच साधनेचे बळ नसल्याने जीव गटांगळया खात रहातो. श्राद्धपक्षादी विधी न केल्यास पूर्वजांना गती मिळत नाही. तसेच तीर्थक्षेत्री श्राद्ध केले, तरी ज्या पितरांची पुढील गती मिळण्याची वेळ जवळ आली असेल, तेवढ्याच पूर्वजांना त्या वेळी गती मिळते. त्याव्यतिरिक्त इतर पूर्वजांसाठी दर वर्षी श्राद्ध करणे आवश्यक असते.
२. ज्या पितरांची पातळी जास्त असेल, त्यांच्यासाठी धर्मशास्त्रात सांगितले आहे म्हणून व समाजासमोर धार्मिक विधींचा आदर्श ठेवण्यासाठी श्राद्ध करावे; कारण पातळीपेक्षा धर्मपालन महत्त्वाचे असते. पितरांची पातळी किती आहे, हे सांगणारेही समाजात नसतात.
३. काही संत समाजासमोर आदर्श रहावा, यासाठी स्वत:देवपूजा करतात. खरे तर त्यांना स्थूलातून देवपूजा करण्याची आवश्यकता नसते. तसे हे आहे.
वरील उत्तरे लक्षात घेऊन सर्वांनी धर्मपालन म्हणून श्राद्धपक्षादी विधी करावेत.
३. श्राद्धविधीचा इतिहास
या मुद्द्यात आपण श्राद्धाचा इतिहास व अग्नौकरण, पिंडदान व ब्राह्मणभोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था यांबाबत माहिती पाहणार आहोत.
अ. श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रुढ आचार आजही सुरू आहे.
आ. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात.’
इ. लक्ष्मण व जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो व त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो, असा उल्लेख रामायणात आहे.
इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था व सांप्रत काळातील अवस्था
अ. अग्नौकरण : ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे.
आ. पिंडदान (पिंडपूजा) : यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत व गृह्य सूत्रे यांत पिंडदानाचे विधान आहे. गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले.
`पिंडपूजेला कधी सुरुवात झाली यासंबंधीची पुढील माहिती महाभारतात (शांतीपर्व १२.३.३४५) आहे – विष्णूचा अवतार वराहदेव याने श्राद्धाची संपूर्ण कल्पना विश्वाला दिली. त्याने आपल्या दाढेतून तीन पिंड काढून ते दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले. `त्या तीन पिंडांना वडील, आजोबा व पणजोबा यांचे स्वरूप समजले जावे’, असे सांगून त्या पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त पूजा करून वराहदेव अंतर्धान पावला. अशा तर्हेने वराहदेवाच्या सांगण्याप्रमाणे पितरांच्या पिंडपूजेला सुरुवात झाली.’
इ. ब्राह्मणभोजन : गृह्यसूत्रे, श्रृती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मणभोजन आवश्यक मानले गेले व तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला.
ई. वरील तीनही अवस्था एकत्रित : सांप्रत काळातील `पार्वण’ श्राद्धात वरील तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
(संदर्भ : सनातनच्या श्राद्धविषयक ग्रंथ मालिकेतील ग्रंथ `श्राद्ध – महत्त्व व शास्त्रीय विवेचन’)
४. श्राद्धामुळे होणारे फायदे
अ. श्राद्धविधी हा शुभ, कल्याणकारक, पुत्र देणारा व यश देणारा असा पितृयज्ञ आहे. श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्ती होते, याविषयी स्मृतिचंद्रिकेत व इतर ग्रंथांत एक श्लोक दिला आहे, तो पुढीलप्रमाणे
आयु: पुत्रान् यश: स्वर्गं कीर्ति पुष्टिं बलं श्रिय: ।
पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात् ।।
अर्थ : आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने (श्राद्ध केल्याने) प्राप्त होतात.
आ. ग्रहणात श्राद्ध केल्याने श्राद्धकर्त्याला पृथ्वीदानाचे फळ मिळते.’
५. श्राद्ध कधी करावे ?
सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे; मात्र मृत्यूतिथी माहिती नसल्यासही श्राद्ध करता येते, याबाबतची माहिती आज पाहू.
सर्वसाधारणत: योग्य तिथी सर्वसाधारणत: अमावास्या, वर्षातल्या बारा संक्रांती, चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी व मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे, मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे आगमन इत्यादी तिथी या श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.
श्राद्धविधी अमुक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !
१. सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास, माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
३. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
४. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
५. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास, दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
६. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.
७. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.
(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? – संकलक)
६. श्राद्धाच्या देवता
अ. पुरुरव-आर्द्रव व धूरिलोचन : पुरुरव-आर्द्रव व धूरिलोचन हे पितरांचे विश्वेदेव आहेत. श्राद्धात यांचा उल्लेख केला जातो.
आ. वसु-रुद्र-आदित्य
१. `श्राद्धाचा संबंध वसु, रुद्र व आदित्य या पितरांच्या अधिष्ठात्री देवतांशी आहे. श्राद्धमंत्र व विधी हे या देवतांशी संपर्क साधून देतात.’
२. ज्याला उद्देशून श्राद्ध करायचे त्या मृत व्यक्तीची वसुगणांत गणना होते, त्याच्या माता-पित्याची रुद्रगणांत व आजी-आजोबांची आदित्यगणांत गणना होते; म्हणून श्राद्धाच्या वेळी वसु-रुद्र-आदित्य यांचे प्रतिनिधी म्हणून पिता-पितामह-प्रपितामह (किंवा माता-पितामही-प्रपितामही) यांचा उच्चार केला जातो.
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)
७. श्राद्धाचे प्रकार
अ. मुख्य व प्रचलित प्रकार : मत्स्यपुराणात म्हटले आहे, `नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविध श्राद्ध मुख्यते ।’ अर्थात नित्य, नैमित्तिक व काम्य असे श्राद्धाचे तीन मुख्य प्रकार आहेत. यमस्मृतीमध्ये वरील तीन
प्रकारांबरोबरच नांदी श्राद्ध व पार्वण श्राद्ध हेही मुख्य प्रकार सांगितले आहेत.
अ १. नित्य श्राद्ध : दर दिवशी केल्या जाणार्या श्राद्धाला नित्य श्राद्ध म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.
अ २. नैमित्तिक श्राद्ध : मृतात्म्यासाठी केली जाणारी एकोद्दिष्ट वगैरे प्रकारची श्राद्धे ही नैमित्तिक श्राद्धे आहेत.
अ ३. काम्य श्राद्ध : विशिष्ट कामना धरून, म्हणजे `कामनापूर्ती व्हावी’, या उद्देशाने केल्या जाणार्या श्राद्धाला काम्य श्राद्ध, असे म्हणतात.
८. श्राद्धाची तयारी
श्राद्धासाठी लागणार्या साहित्याची आदल्या दिवशीच खरेदी करावी. श्राद्धासाठी लागणारे साहित्य व वर्ज्य पदार्थ येथे दिले आहोत.
श्राद्धासाठी लागणारे साहित्य
सर्वसाधारण साहित्य (श्राद्धद्रव्ये) : आसने, तीन ताम्हणे, तांब्या, पळी-पंचपात्रे, दर्भ, पांढरी लोकर, वस्त्र, धोतर, जानवी जोड, पंचा, शाल, चादर, पांढरे गंध, उगाळलेले गोपीचंदन, काजळ किंवा सुरमा, कापूर, धूप, दीप, सुवासिक पांढरी फुले, माका, तुळस, काळे तीळ, सुपार्या, अगस्तीची पाने, विड्याची देठ असलेली पाने, सातू, काीही (न सडलेला तांदूळ), यव (सवाद), काळे तीळ, उडीद, गहू, सावे, मूग व मोहरी, मध, सुटे पैसे, भस्म, केळीची पाने किंवा मोहाच्या पत्रावळी, केळीचे द्रोण, तयार झालेला स्वयंपाक, तूप व कालास अनुसरून दक्षिणा.
अधिक योग्य पदार्थ (फुले, फळे व धान्य) : अगस्ती, कांचन, मोगरा, जाई, जुई, सोनटक्का, दुहेरी तगर, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुळी, सुरंगी इत्यादी फुले; महाळुंग, उंबर, आवळे, चिंच, आमसूल, आंबाडा, कवठ, मकाणा, अक्रोड, चारोळी, खारीक, खजूर, नारळ, केळी, द्राक्षे, डाळिंब, बोरे, फणस, खरबूज इत्यादी फळे व सुका मेवा; काळे उडीद, सावे, राळे, चुका, प्रियंगु, मोहरीचा कल्क, देवभात व लाह्या.
वर्ज्य पदार्थ : श्राद्धासाठी लागणार्या उपयुक्त पदार्थांचा विचार करतांनाच श्राद्धासाठीचे वर्ज्य पदार्थ कोणते, याचाही विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. वर्ज्य पदार्थांची यादी पुढे दिली आहे.
अ. कांदा, लसूण, मीठ, वांगे, वाटाणे, हरीक व पुलक नावांचे भात, राजगिरा, शेवगा, गाजर, कोहळा, वावडींग, मांस, काळे जिरे, मिरी, बिडलोण, शीतपाकी, अंकुर फुटणार्या भाज्या, शिंगाडे, जांभळया रंगाचे व नासलेले-कुजलेले पदार्थ.
आ. दुर्गंधीयुक्त, खारे, शिळे, ज्याने गायीची तहान भागत नाही असे, डबक्यातले व रात्री भरून ठेवलेले पाणी.
इ. वत्सरहित किंवा प्रसूत होऊन दहा दिवस पूर्ण न झालेल्या गायीचे दूध
ई. बकरी, मेंढी, घोडी, उंटीण, म्हैस यांचे दूध व दुधाचे पदार्थ (मात्र म्हशीचे तूप योग्य आहे.)
उ. मांजर, कुत्रा, उंदीर इत्यादींनी उष्टावलेले पदार्थ
ऊ. पूर्वी प्रणीवध करून मांसाने पितरांना तृप्त करीत, असा आधुनिक वेद-संशोधकांचा दावा आहे; पण ब्राह्मणांना मांसभक्षण निषिद्ध आहे. (श्राद्धात ब्राह्मणभोजन महत्त्वाचे मानले आहे.) यासंदर्भातील एक श्लोक पुढीलप्रमाणे –
यस्तु प्रणिवधं कृत्वा, मांसैस्तर्पयते पितृन् ।
स विद्वांश्चन्दनं दग्ध्वा कुर्यादंगार विक्रयम् ।।
क्षिप्त्वा कूपे यथा कंचित् बाल आदातुमिच्छति ।
पतत्यज्ञानत: सोऽपि मांसेन श्राद्धकृत्तथा ।।
अर्थ : प्रणीवध करून जो मांसाने पितरांना तृप्त करतो, तो `चंदन जाळून कोळशाचा व्यापार करायला सिद्ध झाला आहे’, असे समजावे. विहिरीत एखादा पदार्थ टाकल्यावर तो घेण्याकरता हात लांब करून डोकावणारा बालक जसा विहिरीत पडतो, तसेच मांसाने श्राद्ध करणारा स्वत:च्याच हाताने स्वत:चा विनाश ओढवून घेतो. मांसाने श्राद्ध करणार्याला पाप लागते.
९. श्राद्धाची परिभाषा
अ. पितर : मनुष्य मृत पावल्यानंतर त्याचा लिंगदेह श्राद्धादी विधींनंतर प्रेतयोनीतून मुक्त होतो व त्याला पितृलोकात स्थान मिळते. त्या वेळी तो पितर या पदाला प्राप्त होतो.
आ. पार्वण : सपिंडीकरण श्राद्धानंतर (वर्षपूर्तीच्या म्हणजे अब्दपूर्तीच्या आदल्या दिवशी करण्यात येणारे श्राद्ध, म्हणजे सपिंडीकरण श्राद्ध.) पितर या पदाला पोहोचलेला मृतात्मा इतर पितरांशी संलग्न होतो व पार्वणांच्या यादीत जातो, तसेच तो पार्वणश्राद्धाचा अधिकारी होतो. हे श्राद्ध पित्रादी त्रयीला उद्देशून केले जाते. प्रतिसांवत्सरिक, अमावास्यादी ९६ श्राद्धे, महालय हे पार्वण श्राद्धाचे प्रकार होत.
इ. पितृत्रयी (पितरांतील त्रयी) : सर्वसामान्यत: मृत व्यक्तीचे श्राद्ध हे तिच्या मुलाने करायचे असते. तो नसेल, तर इतर पर्याय योजतात. श्राद्धाची परिभाषा श्राद्धकर्ता हा मुलगा आहे, असेच धरून बनवलेली आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी श्राद्ध करायचे त्या मृतात्म्याचा उल्लेख श्राद्धात `पिता’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचा पिता या अर्थाने). त्याच्या आधीच्या पिढीचा, म्हणजेच मृतात्माच्या पित्याचा उल्लेख `पितामह’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचे आजोबा या अर्थाने).
त्यांच्याही आधीच्या पिढीचा, म्हणजेच मृतात्म्याच्या आजोबांचा उल्लेख `प्रपितामह’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचे पणजोबा या अर्थाने). त्यांच्या आधीच्या पिढ्यांची गणना पितृत्रयीत होत नाही; कारण त्यांना मुक्तरूप मानलेले आहे
ई. जीवत्पितृक :
ज्याचा पिता जिवंत आहे असा मुलगा. जीवत्पितृकास पितृश्राद्धाचा अधिकार नाही; पण मातामहश्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) व मातेचे श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. तसेच एरव्ही नारायणनागबली, त्रिपिंडी यांचा अधिकार जीवत्पितृकास नसतो; पण संतानप्राप्तीसाठी केलेल्या या विधींचा अधिकार जीवत्पितृकास असतो. नारायणनागबली यासारख्या विधीचा उद्देश अतृप्त लिंगदेहांमुळे होणारे त्रास दूर करणे हा असल्याने, लग्न न झालेल्या जीवत्पितृकासही हा विधी करण्याचा अधिकार काही ठिकाणी दिला जात असल्याचे आढळते. जीवत्पितृकास अपसव्याचे वेळी फक्त डाव्या हाताच्या अंगठ्यात जानवे अडकवून अपसव्य करावे लागते; पूर्णपणे डाव्या हातात घालता येत नाही.
उ. जानवे घालण्याचे प्रकार – सव्य, अपसव्य व निवीत :
जानवे गळयात घालतांना ते नेहमी डाव्या खांद्यावर असावे. त्या अवस्थेला `सव्य’ म्हणतात. ते उजव्या खांद्यावर घेतले की, त्या अवस्थेला `अपसव्य’ म्हणतात. माळेसारखे गळयात सोडले की, त्याला `निवीत’ म्हणतात.
ऊ. क्षण देणे :
श्राद्धाच्या वेळी देव व पितर यांना एक एक दर्भ अर्पण करून निमंत्रित केले जाते. यालाच क्षण देणे असे म्हणतात.
१०. तर्पण
१. व्युत्पत्ती व अर्थ : `तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. `तृप्’ या धातूपासून तर्पण हा शब्द तयार झाला आहे. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली (उदक) देऊन तृप्त करणे, म्हणजे तर्पण होय.
२. उद्देश : ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो.
३. प्रकार : ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे) अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात व ती त्या त्या प्रसंगी करायची असतात.
४. तर्पण करण्याची पद्धत
अ. `तर्पण नदीवर करावे’, असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे.
आ. देव व ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन व पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते.
इ. `देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने व पितरांचे अपसव्याने करावे’, असे शास्त्र आहे.
ई. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून व अग्रावरून पितरांचे तर्पण करावे.
उ. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका व कनिष्ठा यांच्या मुळांतून ऋषींना आणि तर्जनी व अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).
ऊ. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन व पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.’
(`अंजली’ या शब्दाचा मूळ अर्थ `ओंजळ’, असा होतो. येथे मात्र `एक अंजली तर्पण द्यावे’, म्हणजे `एकदाच तर्पण द्यावे’, अशा अर्थाने `अंजली’ हा शब्द वापरला आहे. – संकलक)
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)
११. पितृतर्पण
१. व्याख्या : पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे.
२. का करावे ? : पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.
३. महत्त्व : तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश व अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्त करतात.
४. कधी करावे ?
अ. देव, ऋषी व पितर यांना उद्देशून नित्य (दर दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे.
आ. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्या दिवशी पितृतर्पण करावे.
५. तीलतर्पण : पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे व पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्यांच्या ऐवजी सोने किंवा रुपे वापरावे.
अ. `तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.
आ. जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.
इ. दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.
ई. नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.’
६. तीलतर्पणाचे महत्त्व
अ. `पितरांना तीळ प्रिय आहेत.
आ. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करत नाहीत.
इ. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना
तीळमिश्रित जल द्यावे व तिळांचे दान द्यावे.’ – जैमिनीय गृह्यसूत्र (२.१), बौधायन धर्मसूत्र (२.८.८) व बौधायन गृह्यसूत्र
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)
१२. अविधवा नवमी
अ. अर्थ
सौभाग्यवती असतांना मृत झालेल्या स्त्रीच्या नावे सुवासिनीला जेवण देऊन मृत स्त्रीचा आत्मा तृप्त करणे (भाद्रपद वद्य नवमीला हे नाव आहे. स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास या दिवशी तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे सुवासिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे. – संकलक)
आ. महत्त्व
आ १. शास्त्रात या दिवशी मृत्यू येणार्या स्त्रियांची गणना पुण्यश्लोकात केली जाते. त्यामुळे ही तिथी पितृपक्षातील असली, तरी ती स्त्रियांसाठी चांगली मानली जाते.
आ २. सौभाग्यवती स्त्री म्हणजे प्रकट शक्तीचे प्रतीक असल्याने या दिवशी वातावरणात शक्तीचे ३ टक्के तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे पितृपक्षातील इतर दिवस व हा दिवस यांत काही प्रमाणात बदल असल्याचे लक्षात येते.
(साधकांनी पितृपक्षातील इतर दिवस व हा दिवस यांत जाणवणार्या फरकाचे परीक्षण करावे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गती वाढेल व येणार्या तत्त्वाच्या लहरींमुळे तीव्र तळमळ आणि गुरुनिष्ठा असलेल्या २ टक्के साधकांना या दिवसापासून सूक्ष्मातून ज्ञान मिळणे सुरू होईल.)
इ. विधी
इ १. मृत झालेल्या स्त्रीच्या बरोबरीच्या स्त्रीला जेवायला बोलवावे, उदा. मृत झालेली स्त्री गर्भवती असेल, तर गर्भवती स्त्रीला, वयस्क असेल, तर वयस्क स्त्रीला.
इ २. मृत झालेल्या स्त्रीची ज्या स्त्रीमध्ये अधिक आसक्ती असते, तिला मृत स्त्रीच्या नावे जेवायला बोलावू नये. या दिवशी मृत स्त्रीचा आत्मा भटकत असतो व आसक्तीमुळे त्या आत्म्याने त्या सुवासिनीच्या देहाचा ताबा घेण्याची शक्यता असते.
इ ३. सौभाग्यवती मृत स्त्रियांच्या संसारातील इच्छा नेहमी अतृप्त असतात. त्यामुळे या दिवशी त्यांचे छायाचित्र २ तासांपेक्षा अधिक काळ घरात ठेवू नये.
इ ४. मृत स्त्रीला पुढची गती मिळून तिला पुढच्या योनीत जाता यावे, यासाठी विधी पार पडल्यावर घरातील सर्वांनी १५ माळा `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.
इ ५. इतर विधी पितृपक्षात दिल्याप्रमाणे करावेत.
- श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ८.९.२००५, रात्री ९.४८)
१३. इतर माहिती
पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवायचा एकमेव मार्ग
डॉ. आठवले
`पूर्वजांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी; म्हणून दत्ताचा नामजप, नारायणनागबळी विधी वगैरे उपाय करण्यात येतात. त्यांमुळे तात्पुरता फायदा होतो. पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे आपले पूर्वज बदलणे.
`पूर्वज कसे बदलायचे’, असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. त्याचे उत्तर पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.
१. मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिच्या माहेरच्या पूर्वजांशी तिचा असलेला संबंध कमी होतो व सासरचे पूर्वज तिचेही पूर्वज होतात.
२. जेव्हा एखादा संन्यास घेतो, तेव्हाही त्याचे कुटुंबीय व पूर्वज यांच्याबरोबरचे संबंध संपतात.
३. श्री. दिनकर सखारामपंत कसरेकर हे जेव्हा `प.पू. भक्तराज महाराज’ झाले, तेव्हा ते त्यांचे नाव `भक्तराज, गुरु अनंतानंद साईश’, असे लिहू लागले. तेव्हापासूनच कसरेकर घराण्याच्या पूर्वजांचा व त्यांचा संबंध संपला.
आपल्या सर्वांचा खरा पूर्वज एकच आहे व तो म्हणजे ईश्वर. आपण त्याच्या कुटुंबाचे व्हायचे, हाच पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवायचा एकमेव मार्ग आहे.’
- डॉ. आठवले (१५.४.२००७)
पूर्वजांना मुक्ती मिळण्याच्या संदर्भात `श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व
हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण ही चार ऋणे फेडणे आवश्यक असते. त्यांपैकी पितृऋण फेडण्याच्या संदर्भात अनेकांना वाटते की, केवळ मृत आप्तेष्टांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण केला म्हणजे आपण पितृऋणातून मुक्त झालो. त्यांच्या बाराव्या दिवशी अथवा मृत्यूच्या वार्षिक दिनी `तुझ्या आठवणींशिवाय एकही क्षण जात नाही….’ अशा आशयाची एखादी जाहिरातही काही जण त्यांच्या छायाचित्रासह देतात. ही केवळ एक मानसिक औपचारिकता आहे. त्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळू शकत नाही. उलट अशा प्रकारचे पूर्वजांचे स्मरण करणे म्हणजे त्यांच्या भुवलोकातून पुढच्या जन्माकडे जाण्याच्या मार्गातील अडथळा होय. त्यांचे लिंगदेह अशा गोष्टींमुळे भूलोकाकडे आकर्षित होऊन भुवलोकातच घुटमळत रहातात. `श्राद्ध न करता त्याऐवजी आम्ही गरिबांना अन्नदान करू, शाळेला मदत करू’, असे काही जण म्हणतात; मात्र धार्मिक विधींचा अभ्यास केल्यावर असे म्हणणे हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. आपल्या पाठीमागे साधनेचे बळ असेल, तर पूर्वजांना मुक्ती मिळणे सहज शक्य होते. भगीरथाने ६० हजार वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली. कलीयुगात हे शक्य नसल्याने श्राद्धपक्षादी विधींबरोबच आपल्याला होत असलेल्या त्रासाच्या तीव्रतेनुसार `श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप दररोज ३ किंवा ६ माळा करावा. त्रासाची तीव्रता खूपच जास्त असल्यास ९ माळा जप करावा. तसेच श्राद्धपक्षातही दत्ताचा नामजप जास्तीतजास्त करावा. आपण केलेल्या या नामसाधनेमुळेही पूर्वजांना लवकर मुक्ती मिळण्यास मदत होते. हल्लीच्या काळात `श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे.
मृत व्यक्तीचे छायाचित्र पुढील कारणांसाठी कोठेही लावू नये.
१. मृत व्यक्तीचा लिंगदेह तिच्या छायाचित्राकडे आकर्षित होतो व त्यामुळे त्याच्या पुढील गतीमध्ये अडथळा निर्माण होतो.
२. मृत व्यक्तीचे छायाचित्र समोर असल्यास तिची वारंवार आठवण येते. परिणामी तो लिंगदेह आठवण काढणार्याकडे वारंवार खेचला जातो. त्यामुळे भावनेच्या स्तरावर आठवण काढण्यापेक्षा किंवा आठवण आल्यास श्री दत्तगुरूंना `त्या मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला उत्तम गती मिळूदे’, अशी प्रार्थना करावी.
३. श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या ३ ते ९ माळा जप नित्य करावा व श्राद्धादी विधी करावेत. त्यामुळे लिंगदेहाला पुढील गती मिळणे सुलभ होते. – संकलक)
श्राद्धाच्या वेळी मृत व्यक्तीचे छायाचित्र लावावे व एरव्ही ते विभूती लावून दत्तगुरूंच्या चित्राबरोबर `श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी चिकटवून पिशवीत ठेवावे
एक विद्वान : एरव्ही ते छायाचित्र भिंतीवर प्रथमदर्शनी न लावता दत्तक्षेत्रातील विभूती छायाचित्रावर लावून पिशवीमध्ये थोडी विभूती घालून ठेवावे किंवा दत्तगुरूंच्या चित्राबरोबर पिशवीत घालून ठेवावे किंवा छायाचित्राच्या मागे `श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी चिकटवून पिशवीत ठेवावे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, रात्री ९.३४)
वाईट शक्तींच्या निवारणासाठी रशियन संसदेने संसदेची शुद्धी केली !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
रशियन संसदेच्या सदस्यांनी संसद भवनाला वाईट शक्तींच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सायबेरियन तांत्रिक टोइजिन बर्गेनोव्ह यांना बोलावले होते. बर्गेनोव्ह यांनी जून २००४ पासून रशियन संसद भवनातून वाईट शक्तींना पळवून लावण्याचे काम सुरू केले. या उपायांमुळे संसद भवन, संसद सदस्य व तेथे काम करणारे कर्मचारी यांना या वाईट शक्तींचा त्रास सोसावा लागत नाही. रशियन संसद भवनातून वाईट शक्तींना घालवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १९९४ मध्ये स्थानिक ऑर्थोडॉक्स चर्चच्या एका पाद्र्याने संसद भवनात शुद्धीकरण केले होते. आता करण्यात येणार्या शुद्धीकरणामुळे संसद भवन प्रदीर्घ कालावधीसाठी वाईट शक्तींपासून मुक्त राहील, असा संसद सदस्यांना विश्वास आहे. (दैनिक `भास्कर’, गुरुवार १३ मे २००४)
भूत, पिशाच, करणी, भूतबाधा व ईश्वर यांसारख्या सर्व संकल्पना खोट्या असल्याचे सांगणार्या साम्यवाद्यांचा प्रभाव गेली कैक वर्षे रशियन संसदेवर होता. या साम्यवाद्यांच्या वैचारिक जोखडातून केवळ १० वर्षांपूर्वी मुक्त झालेल्या रशियातील खासदारांना या सर्व संकल्पना मान्य होतात, मग भारतातील साम्यवाद्यांना व बुद्धीप्रामाण्यवाद्यांना त्या का मान्य होत नाहीत ?
पुनर्जन्म का मानावा ?
कारणे
अ. कृतप्राणाश : `आपण जी कर्मे करतो, त्यांचे सुख-दु:खात्मक फल आपणाला प्राप्त होते. पुनर्जन्म न मानला, तर केलेल्या कर्माची फलाप्राप्ती न होताच विनाश होईल. म्हणजे इथे `कृतप्राणाश’ आहे. पुनर्जन्म न मानला, तर या जीवनात माणसाने जी जी सत्कर्मे वा दुष्कर्मे केलीत, त्यातील जी याच जन्मात फलद्रूप होत नाहीत, ती वाया गेलीत असे होईल, हाच कृतप्राणाश !
आ. अकृताभ्यागम : काही माणसे श्रीमंत, निरोगी, बुद्धीमान असे जन्माला येतात, याचे कारण काय ? तसेच काही माणसे जन्मत:च दरिद्री असतात; पंगू, आंधळे, मुके व रोगी असतात; हीन जातीत जन्म घेतात. ही जी दु:स्थिती जन्मत:च प्राप्त झाली, याला कारण काय ?
पुनर्जन्म न मानला, तर दुष्कर्म वा सत्कर्म यावाचून ती स्थिती प्राप्त झाली, असे होईल. यालाच `अकृताभ्यागम’ म्हणतात.
मृत्यूनंतरची गती
१. `ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी : हे ईश्वर मानतात, पुनर्जन्म मानीत नाहीत. त्यांचा जीवात्मा मृत्यूनंतर देवदुताच्या निवाडयाप्रमाणे कायमचा स्वर्ग वा नरक यांतच रहातो. त्याला कर्मभोग संपवण्याचा कोणताच मार्ग नाही.
२. हिंदु धर्म : जीवात्मा हा मृत्यूनंतर देवलोकी वा यमलोकी जातो.
अ. मृत्यूनंतर देवयान मार्गाने ज्ञानी व तपस्वी ब्रह्मलोकात जातात.
आ. पुण्यवान लोक पितृयानमार्गाने परलोकी स्वर्गात जातात, पुण्य भोगून पुन्हा मृत्यूलोकात येतात.
इ. पापी इथेच नाना नीच योनीत जन्म घेऊन भटकतात.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)
विधी करणार्या ब्राह्मणांची मानसिकता !
श्राद्धविधी करण्यासाठी एका ब्राह्मणाकडे गेलेल्या एका महिलेला आलेला अनुभव :
`श्राद्धविधी करण्यासाठी किती खर्च येईल व विधी करण्यासाठी आपण किती वाजता येणार’, हे विचारण्यासाठी एक महिला विधी करणार्या ब्राह्मणाकडे गेली होती. चौकशी केल्यावर त्यांनी `३५० रुपये खर्च येईल व विधी आमच्या पद्धतीने करू’, असे सांगितले. त्यावर त्यांना `पिंडदान करणार ना’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “आम्हाला वेळ असला, तर करू. नाहीतर अर्ध्या तासात उरकून घेऊ.”
(शास्त्राला बगल देऊन विधी उरकणारे पुरोहित समाजाची फसवणूकच करत आहेत. – संकलक) हे ऐकल्यावर त्या महिलेने त्यांना स्पष्टपणे सांगितले, “असे असेल, तर विधी करायला नको !” त्यानंतर सदर महिला सनातन आश्रमात आली व तिने सनातने प्रकाशित केलेली `पितृपक्ष व महालय श्राद्ध’ ही ध्वनीचित्र-तबकडी खरेदी केली आणि सांगितले, “मी या ध्वनीचित्र-तबकडीचा अभ्यास करून त्याप्रमाणे विधी करीन.” – सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
पिंडदानामागील पुरोहितांचे अज्ञान !
हिंदूंनो, धार्मिक विधींमागील शास्त्र समजून घ्या !
आमच्याकडे प्रतिपदेला (८.९.२००६ रोजी) महालय श्राद्ध होते. इथल्या एक-दोन पुरोहितांना विचारले असता त्यांनी सांगितले, “आम्ही हे विधी करत नाही.” शेवटी एकाच्या ओळखीने एक पुरोहित मिळाले. ते विधी करण्यासाठी घरी आले. त्यांना `काय काय विधी करणार’, असे विचारल्यावर ते म्हणाले, “प्रथम पुरोहितांची पाद्यपूजा, त्यानंतर वडील, आजोबा व पणजोबा यांच्या नावे तीलतर्पण आणि दर्भाची अंगठी घालणे व शेवटी पुरोहितांना शिधा व दक्षिणा देणे, हे विधी करू.” मी विचारले, “पिंडदान करणार नाही का ?” तेव्हा ते म्हणाले, “पिंडदान हे वर्षश्राद्ध असेल किंवा मृत व्यक्तीचा दहावा दिवस असेल, त्या वेळीच करतात. (हे पूर्णपणे चुकीचे आहे. अपवादात्मक भाग सोडल्यास प्रत्येक श्राद्धाला पिंडदान सांगितलेले आहे. एवढेच नव्हे, तर गुरुचरित्रात असे सांगितले आहे की, श्राद्धदिनी न करी पिंडदान, तोही होय चांडाळ । म्हणजे जो श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करत नाही, तो चांडाळ होय.)आजचा दिवस पितरांची आठवण म्हणून करायचा असतो.” (पिंडदान श्राद्ध करणे म्हणजेच खरी आठवण. – संकलक) मी त्यांना सनातन प्रभातचा `पितृपक्ष विशेषांक’ देऊन पिंडदानामागील शास्त्र सांगितले; पण त्यांची अंक वाचण्याची तयारी नव्हती. ते म्हणाले, “आजपर्यंत मी जसा विधी करत आलो आहे, त्या पद्धतीने करूया. पुढील वर्षी सनातन संस्था जसे सांगते, त्याप्रमाणे करेन.” तरीही मी त्यांना पुन:पुन्हा पिंडदान करण्याविषयी सांगूनही त्यांनी माझे न ऐकता तो विधी त्यांच्या मताप्रमाणे व `एक कृती उरकायची आहे’ अशा प्रकारे केला. यावरून लक्षात आले की, समाजातील लोकांना तर धार्मिक विधींमागील शास्त्र माहीत नाहीच; पण पुरोहितांनाही त्यांबाबत अज्ञान आहे. – एक साधक
(यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची किती गरज आहे, हे लक्षात येते. यासाठीच सनातन संस्था धार्मिक विधींमागील शास्त्र सांगणारे ग्रंथ प्रकाशित करत आहे. त्यांमध्ये पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
१. मृत्यू व मृत्योत्तर क्रियाकर्म
२. श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)
३. श्राद्धातील कृतींमागील शास्त्र
४. देवघर व देवपूजेतील उपकरणे यांच्या मांडणीमागील शास्त्र
५. पूजासाहित्याचे महत्त्व काय ?
६. आरती कशी करावी ?
७. नमस्काराच्या योग्य पद्धती – संकलक)
श्राद्धामध्ये पिंडदानानंतर पिंडांना वडे व खीर तसेच काही ठिकाणी वडे व खीर यांसह अन्नाचा नैवेद्य दाखवतात. हा नैवेद्य काही ठिकाणी घरची मंडळी किंवा श्राद्धकर्ता यांना संध्याकाळी खायला सांगतात. तसेच काही ठिकाणी पिठाचे पिंड करतात.
त्या वेळी पिंड तयार करून झाल्यानंतर शिल्लक पिठाचा नैवेद्य पिंडांना दाखवतात. तो नैवेद्य रात्री पोळी भाजून खायला सांगतात. वरील गोष्टी अशास्त्रीय आहेत, याची कल्पना काही पुरोहितांना पूर्णपणे माहीत आहे. काहींना माहीत नाही. तरीपण कुलपरंपरा म्हणा किंवा रीतीरिवाज हे मोडायला पुरोहित किंवा यजमान तयार नसतात. याचे कारण म्हणजे `काही अनिष्ट घडले, तर’ ही भीती असते.
काही ठिकाणी घरातील आई, वडील, काका तसेच घरातील अन्य व्यक्ती यांचे श्राद्ध एकाच दिवशी सोयीनुसार करतात. फक्त महालय श्राद्धात, म्हणजेच पितृपक्षात सर्वांना पिंडदान करता येते. पितृपक्ष सोडून असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक आईच्या तिथीला फक्त आईचेच श्राद्ध, वडिलांच्या तिथीला फक्त वडिलांचे श्राद्ध अन्य मृत व्यक्तीच्या दिवशी केवळ तिचेच श्राद्ध केले पाहीजे. असे असतांना काही जण देवाला कौल लावून वरीलप्रमाणे श्राद्धे करतात. या गोष्टीला काही पुरोहित अनुमोदन देतात. या बाबतीत देवाला कौल लावणे व विचारणे हेच चुकीचे आहे. कारण मृत व्यक्तीचे श्राद्ध त्या त्या तिथीलाच करणे असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतांना सुद्धा वरीलप्रमाणे कृती करणे म्हणजे शास्त्राचे उल्लंघन होते. त्याचबरोबर मृत व्यक्तीला सुद्धा काडीचाही फायदा होत नाही.
साधकांना सूचना : श्राद्धविधी करण्याबाबत प्रत्येकाने स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा !
धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाला चार ऋणे फेडावी लागतात. त्यांपैकी एक म्हणजे पितृऋण. त्यामुळे श्राद्धविधी करून पूर्वजांना गती मिळवून देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. गुरुकृपायोगानुसार साधना करून आध्यात्मिक पातळी वाढल्याने साधकाकडून गुरुऋण फेडले जात आहे. गुरुऋण जेव्हा फेडले जाते, तेव्हा त्या जिवाची अन्य ऋणे आपोआप फेडली जातात; म्हणजेच तो पितृऋणातून मुक्त होतो. अशा जिवाला श्राद्धविधी करणे आवश्यक नाही; मात्र साधना करणार्यांनी तो कार्यकर्ता आहे कि साधक, याबाबत आत्मपरीक्षण करावे व श्राद्ध करायचे किंवा नाही, ते स्वत:च ठरवावे. – सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे, फोंडा, गोवा.
श्राद्धविधी अमुक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !
१. `सामान्यत: दर वर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला)
श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास, माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
३. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
४. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
५. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
६. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.
७. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.’
(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? – संकलक)
श्राद्धात केवळ पितरच नाही, तर इतर देवदेखील असणे
`श्राद्धविधीत पितर असतात, तसेच विश्वेदेव असतात. श्राद्धात आधी विश्वेदेवाचे पूजन, संभावना वगैरे वगैरे विधी-विधाने होतात. एक ब्राह्मण पूर्वेकडे तोंड करून बसतो, तो विश्वेदेव व दुसरा उत्तरेकडे तोंड करून बसतो, तो पितररूपात असतो. वसु, रुद्र व आदित्य हे काही पितरांतच नसतात, तर देवातही असतात. डोळयाने प्रत्यक्ष दिसणारा `सूर्य’ हा यज्ञत्रिक्रियेने निर्माण झाला. त्याच्या रोहित शुक्ल-कृष्ण स्वरूपाचे वसु, रुद्र व आदित्य यांना दर्शन घडते. अमृताचा लाभ होतो. या देवता प्रत्यक्ष अन्नसेवन वा जलपान करत नाहीत, तर वसु, रुद्र व आदित्य या देवता इंद्र, अग्नि, वरुण या देवतांच्या मध्यस्थीने अमृतसेवन करतात.’
(संदर्भ : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित’)
आईच्या अस्थी असलेला डबा घेऊन एक प्रवासी रिक्शात बसल्यामुळे तीव्र डोकेदुखी सुरू होणे व तो रिक्शातून उतरल्यावर आध्यात्मिक उपाय केल्यावर डोके दुखायचे थांबणे :
`२७.९.२००७ रोजी सकाळी मी रिक्शा चालवत असतांना कुर्ला स्थानकात जाण्यासाठी एक प्रवासी माझ्या रिक्शात बसल्यानंतर माझे डोके खूप दुखू लागले. दुखण्याची तीव्रता एवढी वाढली की, मला रिक्शा चालवणेही कठीण जाऊ लागले. मी त्या प्रवाशाला सहजच `कुठे जाणार’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “माझी आई वारली आहे. मी तिच्या अस्थी घेऊन जात आहे.” अधिक चौकशी केल्यावर अस्थी असलेला डबा त्यांच्या हातातच असल्याचे मला कळले. त्या वेळी मला माझे डोके दुखण्याचे कारण लक्षात आले. मी त्या प्रवाशाला नियोजित स्थानी सोडल्यावर मग रिक्शामध्ये विभूतीचे पाणी शिंपडले व उदबत्ती लावली. थोडा वेळ नामजप केल्यावर माझे डोके दुखायचे थांबले.’ – श्री. दिनेश वारंग, घाटकोपर, मुंबई.
१४. अधिक माहिती वाचा
१. कुळातील मृत व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्यांना पुढील गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करावा !
२. पितृपक्ष आज पासून चालू होत आहे. मृत आप्तेष्टांच्या संबंधाने हा कालावधी कसा महत्त्वाचा आहे आणि आपले त्यासंबंधीचे कर्तव्य, याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया.
३. श्राद्ध